भाजपवाल्यांनाे तुमच्या कोंबड्या सांभाळा, कोंबडी चोर आलेत - सुभाष देसाई

भाजपवाल्यांनाे तुमच्या कोंबड्या सांभाळा, कोंबडी चोर आलेत -  सुभाष देसाई

रत्नागिरी - भाजपवाल्यांनाे तुमच्या कोंबड्या सांभाळा. शिवसेनाप्रमुखांनी कोंबडी चोर म्हणून नाव ठेवलेले राणे तुमच्याकडे जात आहेत, अशी उपहासात्मक टिका उद्योगमंत्री तथा शिवसेनेचे कोकण विभागिय संपर्क प्रमुख सुभाष देसाई यांनी केली. भाजपवाले राणेंना सडवून नव्हे, तर कुजवून कुजवून ठेवतील, असा टोलाही त्यांनी मारला.

साळवी स्टॉप येथील स्वामी समर्थ हॉलमध्ये झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधी शिबीराप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. देसाई बोलत होते. याप्रसंगी नारायण राणेंसह आमदार नितेश राणे आणि भाजपवर श्री. देसाई यांनी टिकेचे झोड उठविली.

श्री. देसाई म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी जे बीज रुजविले ते कोकणात आजही कायमस्वरुपी आहे. शिवसेनेची घौडदौड थांबविण्याची कोणामध्ये हिम्मत नाही. दोन चड्डीवाले रत्नागिरीत आले आणि भाजपचे 75 सरपंच निवडून येतील अशी वल्गना करुन गेले. आधी 10 ते 20 सदस्य गोळा करा, नंतर सरपंच निवडून आणल्याचा दावा करा अशी तंबी देसाई यांनी दिली.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा एनडीएतील सहभागाबाबत देसाई यांनी जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले, कोकणात गेले काही दिवस राजकीय घडामोडी घडत आहेत. काँग्रेसमध्ये डाळ शिजत नाही, म्हटल्यावर नारोबाने भाजपचा आश्रय घेतला आहे. ते करतानाही थेट पक्षात जायचे सोडून वाकडी वाट निवडली आहे. पक्ष स्थापन केला आणि त्याचे नाव महाराष्ट्र स्वाभिमान ठेवले. काँग्रेस सत्तेत टिकून राहिल असे वाटल्यानंतर नारायण राणेंनी शिवसेना सोडली. आता भाजप सत्तेवर टिकून राहणार हे लक्षात आल्यानंतर काँग्रसला सोडचिठ्ठी देऊन भाजपची वाट धरली आहे. ज्यांनी भाजपपुढे लोटांगण घातले, त्या पक्षाचे नाव स्वाभिमानी ठेवले आहे. निवडणुक आयोगानेही त्याचा अर्थ विचारला पाहिजे, अशी मिश्किल टिप्पणी देसाई यांनी केली.

राणे स्वार्थी आहेत. निलेश, नितेश यांच्या भविष्याचा विचार सोडून ते अन्य कोणाचे भले करणार नाहीत. हे आता सर्वांनाच समजले आहे. शिवसेनाप्रमुखांनी लाथ मारुन बाहेर काढले तेव्हा राणेंनी काँग्रेसमध्ये जायचा निर्णय घेतला. तेव्हा दहा आमदार त्यांच्या मागे गेले. त्यातील किती आमदार त्यांच्याबरोबर आहेत. कोळंबकर वगळता अन्य कोणीही त्यांना साथ देणार नाहीत. कोळंबकर स्वतःच्या कामामुळे त्या मतदारसंघातून निवडून येतो, त्यांना राणेंची गरज नाही. त्यामुळे स्वाभिमान पक्षात कोण आमदार जाणार हा प्रश्‍नच आहे. आमदारकी जाईल म्हणून नितेश राणेही स्वाभिमान पक्षाच्या मेळाव्याकडे फिरकले नाहीत.  अशी टिका देसाई यांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com