

"दिवाळीनंतर सर्रास गावातील सड्यांवर लागणार्या वणव्यात शेतकर्यांच्या हजारो एकर बागा भस्मसात होतात. शहरी भागात आग लागल्यास नगरपालिका किंवा जवळच्या खासगी कंपनीकडील अग्निशमन बंब तत्काळ उपलब्ध होतो; मात्र, गावपातळीवर ग्रामपंचायतीचा स्वतःचा अग्नीशमन बंब नसल्यामुळे त्यांना नगरपालिकेच्या अग्निशमन बंबावर अवलबूंन राहावे लागते. सध्या अग्निशमन यंत्रणेची स्थिती ‘आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी’ अशीच आहे. जिल्ह्यात ९ नगरपालिकांपैकी ५ ठिकाणी अग्निशमन यंत्रणा उपलब्ध आहे; परंतु ४ ठिकाणी अद्यापही अशी यंत्रणाच नाही. त्यामुळे अनेकवेळा घटनास्थळी वेळेत अग्निशमन बंब पोहचत नाही आणि लाखो रुपयांच्या मालमत्तेची राखरांगोळी होते. हे टाळण्यासाठी ग्रामीण भागांसाठी आपत्कालीन अग्नीशमन यंत्रणा उभारण्याची गरज आहे...!"
- राजेंद्र बाईत, राजापूर