ओबीसींचे आरक्षणाला धक्का न लावता, कुणबी समाजाच्या समन्वयासाठी वज्रमुठ
मंडणगड : कुणबी समाजाच्या न्याय, हक्कांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलने करण्यासोबतच ओबीसींचे आरक्षणाला बाधा पोहचू न देण्याचा निर्धार जिल्ह्यातील कुणबी समाजातील नेतृत्वाने केला आहे. ओबीसींच्या हिताचे प्रश्न, जाणीव जागृतीने विखुरलेल्या कुणबी समाजाची समन्वयाच्या माध्यमातून मूठ बांधून भविष्यात राजकीय क्रांतीचा वेध घेत प्रखर लढा उभारण्याचा संकल्प खेड येथील आयोजित कुणबी समाजाच्या प्रमुख नेते व कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आला.
ओबीसी आरक्षण व जातनिहाय जनगणना पार्श्वभूमीवर लढा उभारण्याच्या उद्देशाने समाज जागृती व क्रांतीची बीजे पेरण्याची सहविचार समन्वय बैठक ११ ऑक्टोबर रोजी खेड येथे झाली. यावेळी नंदकुमार मोहिते बैठकीचा उद्देश स्पष्ट करताना म्हणाले, कुणबी समाजात बंधुभाव, समानता, सलोखा उपजत असून लोकशाही मानणारा आहे. विखुरलेल्या या समाजाचा अनेकजण फायदा घेत असून हक्कांपासून समाजाला नेहमी वंचित ठेवण्यात आले. भाई पोस्टुरे म्हणाले, समाजाप्रती निष्ठा ठेवताना सामाजिक चळवळीत सातत्य ठेवून समाजहितासाठी राजकीय पक्षाची पादत्राणे बाजूला ठेवणे आवश्यक आहे.
दरम्यान संतोष गोवळे म्हणाले, तीस वर्षांपासून समाजाची बुडालेली नाव किनाऱ्यावर लावण्याची वेळ असून समाजाचा विकास राजकीय क्रांतीनेच होईल व भविष्यातील लोकप्रतिनिधी समाज ठरवेल. पत्र व्यवहार, निवेदने देऊन काहीच साध्य होणार नसून कृती आंदोलनातून रस्त्यावर उतरणार असल्याचे अशोक वालम यांनी सांगितले. पक्षात राहून समाजासाठी योगदान द्या, अन्यथा गळ्यातील पक्षांचे पट्टे, पायातील बेड्या तोडून टाका. भविष्यात फेडरेशनच्या माध्यमातून सर्व ओबीसींना सामावून घेण्याचे सूतोवाच त्यांनी केले.
रमेश घडवले म्हणाले, सत्तेतील लोकांची झोपमोड करणारी आंदोलने उभी करून लढण्यासाठी रस्त्यावर उतरा. कृती आंदोलनातून दखल घ्यायला भाग पाडा. प्रा.जी.डी. जोशी म्हणाले, सामाजिक स्तरावर शाश्वत ताकद निर्माण करून राजकीय क्रांती घडविणे क्रमप्राप्त आहे. संघटित संघर्षाने विषमता नष्टतेने राजकीय नेतृत्व निर्माण व्हायला हवे. यावेळी सभेचे अध्यक्ष प्रा.जी.डी. जोशी, नंदकुमार मोहिते, भाई पोस्टुरे, सुरेश भायजे, रमेश घडवले, अशोक वालम, संतोष गोवळे, प्रकाश शिगवण, संदीप राजपुरे, शंकर कांगणे, नंदिनी खांबे, श्री. वाघे, ऍड. श्री. डफळे, श्री. कदम व मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर तालुक्यातील समाजबांधव उपस्थित होते.
हेही वाचा - Good News : लवकरच ग्रंथालये होणार सुरू
मान्यवरांची रोखठोक मते
- ओबीसी आरक्षणात ढवळाढवळ नको
- जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे
- कोकणात प्रदूषणकारक प्रकल्प नकोतच
- आरक्षण संरक्षित करण्याच्या दृष्टीने प्रतिकार
समाजबांधवांच्या मताने जिल्ह्याची बांधणी
रत्नागिरी व खेड येथील बैठकीनंतर जिल्ह्याची बांधणी करण्याच्या दृष्टीने तालुकानिहाय बैठका घेण्यात येणार आहेत. त्यानंतर कुणबी समाजबांधवांच्या मतानुसार दोन दिवसांत जिल्हा कार्यकारिणी तयार केली जाणार असून लवकरच कोअर कमिटी निवडण्यात येणार आहे.
संपादन - स्नेहल कदम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.