सावंतवाडी : धरण उशाला अन् कोरड घशाला!

शहरात गेले कित्येक वर्षे पाण्याचा प्रश्न प्रकर्षाने जाणवत आहे.
धरण उशाला अन् कोरड घशाला!
धरण उशाला अन् कोरड घशाला!sakal

सावंतवाडी: जूनच्या शेवटपर्यंत मुबलक पाणीसाठा असणारे स्वतःच्या मालकीचे पाळणेकोंड धरण असूनही शहरावर टंचाईचे सावट असते. शहरात गेली कित्येक वर्षे पाणी समस्या सतावत असतानाही ती सोडविण्यास अपयश आले. एप्रिल, मेमध्ये काही भागात तर खासगी टँकर मागविण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. त्यामुळे ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ ही म्हण सुंदरवाडीला तंतोतंत लागू होते.

शहरात गेले कित्येक वर्षे पाण्याचा प्रश्न प्रकर्षाने जाणवत आहे. शहराला पुरेसा पाणीपुरवठा करणारे पालिकेचे पाळणेकोंड धरण असतानाही तांत्रिक अडचणींमुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या ठिकाणी इमारतीचे जाळे निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातून शहरीभागाकडे येणाऱ्यांचे प्रमाणही वाढते आहे. एकूणच शहराचे राहणीमान उंचावले असून वस्तीही वाढत आहे. साहजिकच पाण्याची गरज वाढून त्याचा तुटवडा भासत आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने कुणकेरी येथे स्वतःच्या मालकीचे धरण उभे केले आहे. संस्थानकालीन केसरी येथील नळपाणी योजनाही वापरात आहे. अलीकडेच पालिकेने नरेंद्र डोंगरावरून वाहणाऱ्या झऱ्याच्या पाण्यावर नळ पाणी योजना राबवली आहे; मात्र असे असतानाही शहराची भौगोलिक रचना आणि तांत्रिक अडचणी याचा विचार करता, शहरवासीयांना पुरेसे पाणी उपलब्ध करुन देण्यामध्ये पालिका प्रशासन कमी पडत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पाणी प्रश्नाकडे नेहमीच बोट दाखवावेलागले आहे.

येथील पालिकेवर गेली कित्येक वर्षे शिवसेनेची एकहाती सत्ता होती. पाणी प्रश्नावर त्यांनी नेहमीच काम केले; मात्र शंभर टक्के ही समस्या त्यांनाही सोडविता आली नाही. गेल्या दोन वर्षांसाठी नागरिकांनी भाजपकडे सत्ता देऊन पाहिली. तरीही समस्या तशीच आहे. अलिकडे काहीशी वाढ झालेली पाहायला मिळाली. आज शहरातील पाण्याचा प्रश्न लक्षात घेता. बऱ्याच भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. उंच चढाव असलेल्या भागातील लोकांना एप्रिल-मे मध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सोसायटीच्या ठिकाणी पाणी पुरवठा हवा तसा होत नाही. अलिकडेच भाजपच्या सत्ताकाळात नागरिकांचे पाण्यावाचून होणारे हाल लक्षात घेता विरोधकांकडून पाणीप्रश्नावर आवाज उठविला होता. मुबलक पाणीसाठा असतानाही नागरिकांच्या नळाला पाणी का येत नाही, असा सवाल करताना शहरात पाणी चोरी होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

शहरात आज साडेतीन हजार इतकी नळ कनेक्शने आहेत. पालिकेच्या कुणकेरी येथील पाळणेकोंड धरणावरून दिवसाला तीस लाख लिटर पाणीपुरवठा होतो. या धरणाची क्षमता १.०८५ द.ल.घ.मी इतकी आहे. या ठिकाणी २०१६ मध्ये तब्बल ९९ लाख रुपये खर्च करून गोडबोले गेट बांधण्यात आले. यामुळे जवळपास एक मीटरने पाणीसाठा वाढला. केसरी येथे एकशे तीस वर्षांपूर्वीची असलेल्या संस्थानकालीन नळ योजनेतून दिवसाला पाच लाख लिटर पाणीपुरवठा होतो तर नरेंद्र डोंगरावरून झऱ्याच्या पाण्यावर असलेल्या योजनेतून पावसाळ्यामध्ये चार लाख लिटर पाणी पुरवठा होतो.

पालिकेला एकूण मिळणाऱ्या पाण्याचा विचार करता शहरातील नळधारकांना पुरेसा पुरवठा होणे अपेक्षित आहे; मात्र तसे होताना दिसत नाही. केसरी येथील नळ पाणी योजनेवरून होणारा पाणीपुरवठा हा भिडाच्या पाइपमधून होतो. हे पाईप आजच्या स्थितीत जीर्ण झाले आहेत. त्यामुळे बऱ्याचदा ते फुटून ठिक ठिकाणी पाणी गळती होते. त्यामुळे म्हणाव्या त्या क्षमतेने पाणीपुरवठा होत नाही. पाळणे कोंड धरणावरून येणारी जलवाहिनी जीर्ण झाली आहे. शिवाय ती आकाराने लहान आहे. त्यामुळे शहरात पाणी पुरवठा कमी प्रमाणात होतो, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

पाळणेकोंड धरणात मुबलक साठा असूनही सावंतवाडी शहरात टंचाई

वर्षानुवर्षे समस्या सुटेना

पाळणेकोंड धरण असूनही

शहरावर टंचाईचे सावट

एप्रिल, मेमध्ये काही भागांत

टँकर मागविण्याची वेळ

तांत्रिक अडचणींमुळे समस्या गंभीर

लोकसंख्या वाढतेय, पाणी कमी

पुरेसे पाणी देण्यात पालिका प्रशासन कमी

जलवाहिन्या जीर्ण, गळती सुरू

पालिकेकडून नव्याने पाळणेकोंड धरणावरून नवी ४८ कोटींची नळयोजना राबविण्यात येईल. यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. या योजनेच्या कामाला तांत्रिक मंजुरी मिळाली. चार वर्षांपासून ही योजना प्रतीक्षेत आहे. या योजनेतून शहरात चार ठिकाणी पाणी साठवणूक टाक्या उभारण्यात येतील. ही योजना अमलात आल्यास शहरातील पाणीप्रश्न कायमचा मिटेल.

- जयंत जावडेकर,मुख्याधिकारी, सावंतवाडी पालिका

सावंतवाडी ही संस्थान काळातील राजधानी होती. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या पातळीवर खूप आधीपासून येथे काम सुरू झाले. या शहराची निर्मिती नियोजनबद्धरीत्या झाली होती. मात्र, वाढती लोकसंख्या, भौगोलिक स्थिती यामुळे शहरात अनेक प्रश्न वर्षानुवर्षे उत्तराच्या शोधात आहेत. या समस्या येथील सर्वसामान्यांना त्रासदायक ठरत आहेत. हेच प्रश्न मांडणारी मालिका आजपासून...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com