रत्नागिरीत शाळेची घंटा वाजणार लवकरच; पूर्व तयारीला गती

School bell to ring soon in Ratnagiri; Speed ​​up pre-preparation
School bell to ring soon in Ratnagiri; Speed ​​up pre-preparation

रत्नागिरी : शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक सत्राला एक ऑगस्टपासून आरंभ होणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागही सज्ज झाला आहे; मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चाकरमान्यांच्या विलगीकरणासाठी घेतलेल्या 737 शाळा शिक्षण विभागाने ताब्यात घेऊन त्या स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करून वापरण्यास घ्या, अशा सूचना रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी दिल्या. कोरोना विषाणूबाधित तीस गावांमधील शाळांचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर घेण्यात येणार आहे. 

शैक्षणिक सत्र सुरू करण्यासंदर्भातील परिपत्रक नुकतेच शासनाने जारी केले आहे. त्यानुसार बुधवारी (ता. 17) जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी आढावा बैठक घेतली. या वेळी शिक्षण सभापती सुनील मोरे, शिक्षणाधिकारी निशा वाघमोडे, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे उपस्थित होते. 

शाळांची पहिली घंटा कधी वाजणार, याबाबत उत्सुकता होती. शासनाच्या सूचनांची अंमलबजावणी कशी करावी, याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. जिल्ह्यात लाखो चाकरमानी दाखल झाले होते. त्यांना क्‍वारंटाईन करून घेण्यासाठी 737 जिल्हा परिषद शाळा ताब्यात घेतल्या होत्या. सहावी ते आठवीचे वर्ग एक ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. त्यासाठी विलगीकरणासाठी घेतलेल्या शाळा स्वच्छ करणे आवश्‍यक आहेत. मुलांच्या आरोग्याचा प्रश्‍न असून त्या दृष्टीने ग्रामपंचायतींकडून ही स्वच्छता केली जावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

जिल्हा परिषदेच्या दोन हजार 572 शाळा असून 6 ते 8 वर्ग असलेल्या सुमारे 900 शाळांचा समावेश आहे. यामध्ये एकूण विद्यार्थी संख्या 30 हजारांपर्यंत आहेत. एकाच वर्गातील मुले अधिक असतील तर तुकड्यांचे वेळापत्रक ठरवण्यात येणार आहे. एक दिवसाआड वर्ग किंवा तुकडीच्या तासिका घेतल्या जातील, मात्र त्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक अत्यावश्‍यक आहे. वर्गात येणाऱ्या मुलांना मास्क देणे, पिण्याच्या पाण्याचे बॉटल्स, डबा या गोष्टी पालकांनी जबाबदारीने देणे गरजेचे आहे. शाळेत येणाऱ्या मुलांचे थर्मल स्क्रिनिंग किंवा आरोग्य तपासणीची जबाबदारी त्या-त्या आरोग्य उपकेंद्रांवर सोपवण्यात आली आहे. आजारी मुलांना घरीच ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सव्वाशेपर्यंत आहेत. ज्या भागात रुग्ण आढळले आहेत ते कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. जिल्ह्यात 30 कंटेन्मेंट झोन आहेत. त्या भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय हा जिल्हाधिकाऱ्यांवर अवलंबून आहे. ऑगस्टपर्यंत बहुतांश क्षेत्र कोरोनापासून मुक्‍त होणार आहेत. 

पहिली, दुसरीचा निर्णय प्रलंबित 
पहिली, दुसरीच्या शाळा सुरू करू नयेत, अशा सूचना आहेत तर तिसरी व चौथीचे वर्ग सप्टेंबरपासून सुरू केले जातील. याबाबत जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर टाकण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com