मंडणगड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडणगड तालुक्यातील शासकीय यंत्रणा सज्ज आहे. कोरोना संसर्ग ग्रामीण भागात होवू नये यासाठी घ्यावयाची खबरदारी प्रशासन घेत आहे. परंतु, संचार बंदीचा फायदा घेत अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवेत मोडणाऱ्या वस्तूंची चढ्या दराने किंवा वाजवी मूल्यापेक्षा अधिक रक्कमेने विक्री केल्यास दुकांदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात कारवाई करण्यासाठी पथकाची नेमणूक प्रशासनाने केली आहे. यामुळे अशा गोष्टींना चाप बसणार असून ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
शासनाने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीमध्ये ग्रामकृती दलाची निर्मीती केली आहे. यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, पोलीसपाटील, आशा सेविका, अंगणवाडी सेवीका, आरोग्य सेवक यांचा समावेश आहे. संचार बंदीच्या कालावधीत नागरिकांना जिवनावश्यक सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी गाव तसेच शहर ठिकाणी असणारे किराणा माल विक्रेते अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने संचारबंदी कालावधीत ते सुरू ठेवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच दुकानातील माल हा त्याच्या मुळ किंमती पेक्षा ज्यास्त दराने अथवा वाजवी बाजार भावापेक्षा ज्यास्त दराने विक्रि करताना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच दुकानासमोर सोशल डिस्टन्सचे पालन करण्यासाठी तीन फुटांचे अंतर ठेवणे बंधनकारक केले आहे. दुकानदारांना ९ अटी घालून दिल्या असून सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ अंतर्गत कारवाई होणार आहे. कारवाई करण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
विदेशातील ४६ जण होम कोरोन्टाईन, ६८ नागरिकांचा विलगीकरण केंद्रात समावेश
मंडणगड तालुक्यात विदेशातून आलेल्या ४६ जणांना होम कोरंटाईन करून ठेवण्यात आले आहे. तर १ एप्रिल पासून अन्य जिल्ह्यातून आलेल्या ६८ जणांना शहरातील लोकनेते गोपीनाथजी मुंडे येथील महिला वसतीगृहात विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे. त्यांची जीवनावश्यक वस्तुंची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.
हे पण वाचा - ब्रेकिंग - कोल्हापुरात कोरोनाचा तिसरा रूग्ण सापडला
याचबरोबर संपूर्ण तालुक्यात पुरवठा विभागाकडून धान्य पूरवण्यात आले आहे. तर मोफत धान्य पूरवण्याचे काम प्रगती पथावर असून जस जसा पूरवठा होत आहे. तसे धान्य वितरीत करण्याचे काम सुरू आहे. तालुक्यातील शेनाळे, सडे, सोवेली, माहू, पालवणी, वेरळ, अडखळ, पाट, पिंपळोली, वलौते, मंडणगड अशा अकरा पुरवठा धारकांकडे मोफत धान्य पूरवठा करण्यात आला असून पुढील दोन दिवसात तालुक्यातील उर्वरीत अन्य गावांमध्येही मोफत धान्य पूरवठा करण्यात येणार आहे.
तालुक्यातील निम्म्याहून अधिक ग्रामपंचायती निर्जंतुकीकरण्याच्या प्रतिक्षेत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शहरी तथा ग्रामिण भागातील रहिवासी भाग हा निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश शासनाने ग्रामपंचायतींना दिले आहे. असे असताना तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींपैकी केवळ हाताच्या बोटावर मोजण्यात येतील येवढयाच ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात निर्जंतुकीकरण करण्यात आले आहेत. मात्र बहुतांशी ग्रामपंचायतीमंध्ये अद्याप निर्जंतुकीकरण करण्यात आलेले नाही.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.