शासनाचा कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्तीचा निर्णय चिंताजनक - शरद पवार

शासनाचा कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्तीचा निर्णय चिंताजनक - शरद पवार

वेंगुर्ले - ‘कोकणातील आंबा, काजूला योग्य मार्केट मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. शासनाचा कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्तीचा निर्णय चिंताजनक आहे. याचे परिणाम येत्या सहा महिन्यांत दिसतील,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे केले.

श्री. पवार जिल्हा दौऱ्यावर आहेत. आंबोली, सावंतवाडी, मालवण येथे भेटी दिल्यानंतर येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात आंबा, काजू बागायतदार व शास्त्रज्ञ मंच सिंधुदुर्ग यांच्यातर्फे आंबा, काजूविषयक चर्चासत्र झाले. या वेळी श्री. पवार बोलत होते.

आमदार किरण पावसकर, ‘राष्ट्रवादी’चे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, व्हिक्‍टर डान्टस, प्रवीण भोसले, अबीद नाईक, अविनाश चमणकर, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा नम्रता कुबल, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन एम. के. गावडे, तालुकाध्यक्ष धर्माजी बागकर, जिल्हा बॅंकेच्या संचालिका प्रज्ञा परब, पंचायत समितीच्या सदस्या साक्षी कुबल, सरोज परब यांच्यासह ‘राष्ट्रवादी’चे पदाधिकारी, कार्यकर्ते व आंबा बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप व मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी श्री. पवार यांचे शहरात स्वागत केले. आंबा बागायतदार दाजी परब यांनी केशर आंब्याची पेटी पवार यांना भेट दिली.

श्री. पवार म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना अधिक उत्पादनाचे प्रश्‍न पडत आहेत. याचा अर्थ मी राबविलेल्या योजना योग्य होत्या. त्यामुळे आता कोकणातील आंबा, काजूला मार्केट मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मात्र, शासनाने कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्याचा घेतलेला निर्णय चिंताजनक वाटत आहे. याचे सहा महिन्यांत परिणाम दिसून येतील; परंतु शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घातक ठरेल.’’

श्री. पवार म्हणाले, ‘‘कोकणातील आंबा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठविण्यासाठी शेतकरी, बागायतदारांनी एकत्र येऊन गट स्थापन करून सामूहिकरीत्या दर्जेदार माल बाजारपेठांमध्ये पाठवावा. शेतकऱ्यांनी मांडलेल्या प्रश्‍नांवर केंद्र व राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांबरोबर लवकरच बैठक घेणार असून, त्यात शेतकरी व बागायतदार यांच्या शिष्टमंडळाने सहभागी व्हावे.’’

पवार यांनी घेतला आढावा

  • शरद पवार यांची आंबोलीतील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट
  • बिटापासून साखर तयार करण्याच्या प्रयोगावर चर्चा
  • ऊस शेतीच्या संयोजनाची घेतली माहिती
  • सावंतवाडीतील पर्यटनस्थळांची पाहणी
  • पवार यांच्या दौऱ्यावर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांत उत्साह
  • मालवण राष्ट्रवादीतर्फे पवार यांचे जंगी स्वागत
  • वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला भेट

यांत्रिकीकरणासाठी साडेतीन वर्षांत निधीच नाही
तुम्ही मंत्री असताना शेतकऱ्यांना प्रक्रिया करण्यासाठी चालना दिली होती. मात्र, प्रक्रिया यांत्रिकीकरणासाठी आपल्यानंतर गेल्या साडेतीन वर्षांत एक रुपया निधी या सरकारने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिला नाही. यावर तोडगा काढावा, अशी मागणी कृषिभूषण एम. के. गावडे यांनी शरद पवार यांच्याकडे केली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com