"शिवसेना जिल्हाप्रमुखांना खिशात घेवून फिरण्यासाठी सात जन्म लागतील"

shivsena leader rupesh raul challenge for sanju parab
shivsena leader rupesh raul challenge for sanju parab

सावंतवाडी - कुठल्याही गोष्टीवर राजकारण करणे हा शिवसेनेचा धर्म नाही; मात्र आठवडा बाजारावर नगराध्यक्ष संजू परब यांनी राजकारण करत आहेत ते त्यांनी थांबवावे. माजी खासदार निलेश राणे यांना ते खिशात घेऊन फिरत असतील; मात्र शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांना खिशात घेऊन फिरण्यासाठी परब यांना सात जन्म घ्यावे लागतील. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांना संकासूर म्हणणार्‍या परब यांची वर्तवणूक आणि वक्तव्ये पहाता ती नगराध्यक्षासारखी नाहीत, अशी टीका शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

नगराध्यक्ष परब यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख पडते यांच्या वक्तव्यावर काल (ता.5) उत्तर देताना टीका केली होती. याला आज राऊळ यांनी प्रत्यूत्तर दिले. यावेळी बबन राणे, शिवसेना तालुका संघटक अपर्णा कोठावळे, रश्मी माळवदे, प्रशांत कोठावळे आदी उपस्थित होते. राऊळ म्हणाले, “नगराध्यक्ष परब हे माजी खासदार राणे यांना खिशात घेऊन फिरले असतील म्हणून ते अशी वक्तव्य करत आहेत. परब यांना सात जन्म लागले तरी शिवसेना जिल्हाप्रमुखांना खिशात घेऊन फिरणे शक्य होणार नाही. परब यांची नगराध्यक्ष म्हणून वर्तवणूक शोभनीय नाही. मीच मोठा, मीच सर्वांचा राजा आणि मी सांगेल ती पूर्व दिशा अशा प्रकारे ते वागत आहेत. जे सत्य आहे त्यावर दबाव आणायचा आणि दबावाचे राजकारण करायचे हेच त्यांना माहीत आहे. अशाप्रकारे अहंकाराची वागणूक त्यांनी थांबवावी. जनतेने त्यांना नगराध्यक्ष म्हणून निवडून दिले आहे याचा विचार करून त्यांनी जनतेचा आणि व्यापारांचा मान राखणे आणि त्यांना समजून घेणे गरजेचे होते; मात्र असे त्यांनी केले नाही. म्हणूनच आठवडा बाजाराचा वाद वाढत गेला.”

ते म्हणाले, “शिवसैनिकांवर टीका करणार्‍या परब यांनी राजकारण करणे हा शिवसेनेचा धर्म नव्हे तर जनतेच्या प्रश्‍नासाठी धावून जाणे हा शिवसेनेचा धर्म आहे हे समजून घ्यावे. नगराध्यक्ष परब यांनी जी भूमिका घेतली आहे ती शिवसेनेला पटलेली नाही. आठवडा बाजारावरची त्यांची भूमिका चुकीची असल्याने आम्हाला आमची भूमिका जाहीर करावी लागली आणि म्हणूनच आम्ही व्यापार्‍यांच्या पाठीशी राहीलो; मात्र परब यांनी उलट शिवसेना व्यापार्‍यांना हाताशी धरून राजकारण करते असे जाहीर केले. वाद संपून जनतेला न्याय मिळावा हाच आमचा उद्देश होता. यासाठी आम्ही व्यापार्‍यांना पाठिंबा दिला. आम्ही परब यांना आवाहन करतो की त्यांनी आठवडा बाजारावर राजकारण न करता यावर योग्य तो तोडगा काढावा.”
 
ते पुढे म्हणाले, “जिल्हाप्रमुख पडते आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांना संकासुर आणि बिलीमारो अशी जी उपमा दिली ती पूर्णतः चुकीची असून त्यांनी एक प्रकारे कोकणच्या लोककला असलेल्या दशावतार कलेचा अनादर केला आहे.”
अनारोजीन लोबो यांच्या भूमिकेबाबत त्यांना विचारले असता श्री. राऊळ म्हणाले, “पालिका बैठकीमध्ये ज्यावेळी आवश्यकता होती त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक विरोधात आपली भूमिका मांडत राहिले आहेत. लोबो यांची भूमिका योग्य न वाटल्यास त्यावर शिवसेनेचे वरिष्ठ विचार करतील. सद्यस्थितीत त्यांच्या भूमिकेबाबत कुठलाही संशय नाही. येत्या काळातही आपले शिवसेनेचे नगरसेवक आपली भूमिका योग्यरित्या पार पाडत राहणार असून जनतेच्या प्रश्‍नांना बैठकीत न्याय देतील.”

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com