सिंधुदुर्ग : दाबाचीवाडी तलाव पर्यटनापासून दूरच

सुविधा निरुपयोगी; देखभाल, स्वच्छतेच्या अभावामुळे स्थळ दुर्लक्षित
दाबाचीवाडी तलाव पर्यटनस्थळ
दाबाचीवाडी तलाव पर्यटनस्थळ sakal

सिंधुदुर्गनगरी: येथील जिल्हा मुख्यालय परिसरात मध्यवर्ती असलेल्या दाबाचीवाडी तलाव जिल्हा प्रशासनाने पर्यटनदृष्ट्या विकसित केले आहे. येथे बोटिंग सुविधेसह उपाहारगृह, लहान मुलांसाठी झोपाळे, घसरगुंडी, बैठक व्यवस्था, शौचालय यासह आवश्यक अशा विविध सुविधा निर्माण केल्या आहेत; मात्र देखभाल आणि स्वच्छतेच्या अभावामुळे हे पर्यटनस्थळ पर्यटकांपासून दुर्लक्षित राहिले आहे.

येथील दाबाचीवाडी तलाव पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी ४ कोटी ६२ लाख निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून तलावाकाठी नयनरम्य असे प्रशस्त गार्डन तयार करण्यात आले. येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बोटींग सुविधेसह जेटी, उपहारगृह, लहान मुलांसाठी झोपाळे, घसरगुंडी, बैठक व्यवस्था, शौचालय अशा विविध आवश्यक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्गनगरी येथे एकमेव पर्यटनस्थळ म्हणून विकसित झालेल्या या तलावाकाठी असलेल्या सुरुच्या बनामुळे या स्थळाला अधिकच सौंदर्य प्राप्त झाले. तत्कालीन पालकमंत्री राणे यांच्या हस्ते तत्कालीन जिल्हाधिकारी विजयालक्ष्मी बिद्री-प्रसन्ना यांच्या उपस्थितीत या पर्यटनस्थळाचे १० वर्षांपूर्वी मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आले.

सुरुवातीच्या काळात या ठिकाणी विविध प्राथमिक शाळांच्या सहलींसह जिल्हाभरातील नागरिक या पर्यटनस्थळाचा लाभ घेण्यासाठी गर्दी करत होते. स्थानिक नागरिकांसाठीही हे विरंगुळ्याचे ठिकाण बनले होते; मात्र गेल्या काही वर्षांत प्रशासनाकडून या पर्यटनस्थळाची देखभाल आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष केला गेल्याने येथील सौंदर्य बिघडून गेले. नयनरम्य अशा गार्डनचे जंगलात रुपांतर झाले. येथील उपहारगृह, शौचालय यासह विविध सुविधांसाठी बांधलेल्या इमारती झाडाझुडपात गडप झाल्या आहेत. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी बसविण्यात आलेले झोपाळे, घसरगुंडी यासह खेळाचे साहित्य सडत चालले आहे.

नूतनीकरणासाठी ४६ लाख मंजूर

सिंधुदुर्गनगरीच्या पर्यटन विकासात भर घालण्यासाठी विकसित केलेल्या दाबाचीवाडी तलाव पर्यटनस्थळाच्या नूतनीकरणासाठी नव्याने ४६ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे; मात्र अद्यापही नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात झालेली नाही.

निधी असूनही देखभाल नाही

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पालकमंत्री असताना सिंधुदुर्गनगरीच्या विकासात भर घालण्यासाठी आणि येथील नागरिकांच्या सोईसाठी अनेक प्रकल्प उभारले. त्यातीलच एक असलेल्या दाबाचीवाडी पर्यटनस्थळाची स्थिती देखभाल नसल्याने बिकट बनली आहे. प्रशासनाचे या प्रकल्पाकड़े दुर्लक्ष होत असल्याने चांगल्या प्रकल्पाची वाताहत झाली आहे. प्रशासनाने याची तत्काळ दखल घ्यावी, असे माजी सभापती तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश जाधव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com