करूळ घाटात दोन हजार फूट खोल दरीचे द्वार मोकळेच

करूळ घाटात दोन हजार फूट खोल दरीचे द्वार मोकळेच

वैभववाडी - एक दोन नव्हे, तर तब्बल ७२ ठिकाणी दरीच्या बाजूला संरक्षित पर्याय नाही. रस्त्याकडेला कधी काळी बांधलेले दगडी कठडे जीर्ण झाले असून, त्यांच्यामध्ये वाहन थोपविण्याची क्षमता नाही. तुटलेल्या क्रॅश बॅरियर्सची दुरुस्ती नाही. अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. दोन हजार फूट खोल दरी असलेल्या १० किलोमीटरच्या करूळ घाट रस्त्याची सध्याची ही स्थिती आहे. आंबेनळी येथील दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील या धोकादायक घाटरस्त्याकडे प्रशासन आणि शासनकर्ते गांभीर्याने पाहणार आहे का? हा खरा प्रश्‍न आहे.

आंबेनळी घाटातील दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील धोकादायक घाटरस्त्याचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील महत्त्‍वाच्या घाटरस्त्यांपैकी सर्वाधिक वाहतूक असलेला घाट म्हणून करूळ घाटरस्त्याकडे पाहिले जाते. या घाटरस्त्यांची लांबी ९.६ किलोमीटर आहे. या घाटरस्त्याला सुमारे दोन ते अडीच हजार फूट खोल दरी आहे; परंतु सध्या या घाटरस्त्याची अवस्था बिकट आहे. ७२ ठिकाणी दरीच्या बाजूला वाहन थांबेल, असा कोणताही संरक्षित पर्याय नाही. काही दहा तर काही ठिकाणी तीस फुटाचे अंतर रस्त्याकडेला मोकळे आहे. ७२ पैकी २३ ठिकाणे ही धोकादायक वळणावर आहेत. येथे वाहन चालविताना वाहनचालकांच्या काळजात अक्षरश: धस्स होते. त्यामुळे तेथे अपघात घडण्याची अधिक शक्‍यता आहे.

एक नजर करूळ घाटावर...

  •  क्रॅश बॅरियर्स बसावावीत अशी ठिकाणे : ७२
  •  उपाययोजण्याची गरज असलेली वळणे : २३
  •  जीर्ण झालेले कठडे निरुपयोगी
  •  रस्ता खचण्याचे प्रकार सुरूच
  •  रस्त्याकडेला रिप्लेक्‍टर बसविण्याची आवश्‍यकता

काही कठड्यांची उंचीच कमी आहे. जुने कठडे सतत कोसळल्यामुळे त्या जागाही मोकळ्या झाल्या आहेत. या पावसाळ्यात दोन ठिकाणी संरक्षक भिंती कोसळल्या. त्यामुळे तेथे रस्ता खचण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत. दरीकडील बाजुला यापूर्वी बसविलेल्या क्रॅश बॅरियर्सपैकी काही बॅरियर्स तुटले आहेत. त्यांची दुरूस्तीअभावी ते पडून आहेत. घाटरस्त्याला जागोजागी छोटी भगदाडे पडली आहेत. यामुळे रस्ता आणखी खचत जाण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.

या घाटात आतापर्यंत रस्त्यावर दरडी कोसळणे किंवा रस्ता खचणे असे अनेक प्रकार घडले आहेत. जिल्हा प्रशासनाने करूळ घाटात धोकादायक स्थितीत असलेल्या मोकळ्या ७२ जागी क्रॅश बॅरियर्स तातडीने बसविण्याची गरज आहे. जीर्ण कठड्यांची गतीने दुरूस्ती करण्याची आवश्‍यकता आहे. धोकादायक वळणावर असलेल्या २३ ठिकाणी तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे. 

‘‘करूळ घाटात क्रॅश बॅरियर्स बसविणे, संरक्षक कठडे बांधणे, रिप्लेक्‍टर बसविणे याशिवाय सुरक्षितेच्या दृष्टीने आवश्‍यक कामांचा अहवाल तयार केला आहे. नावीन्यपूर्ण योजनेतून या कामांचे प्रस्ताव तयार केले आहेत. याशिवाय संपूर्ण घाटातील कामांचे पुन्हा सर्वेक्षण करणार असून, त्याचा अहवालही वरिष्ठांकडे पाठविणार आहे. तत्काळ उपाययोजना म्हणून रस्त्याकडेला पट्टे मारणे, धोकादायक ठिकाणी बॅरेलची उभारणी करणे हे काम तातडीने हाती घेणार आहे.’’
-  पी. जी. तावडे, 

उपविभागीय अधिकारी, 
बांधकाम विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com