...तर नाणारमधून परब जातील अरब येतील - राज ठाकरे

...तर नाणारमधून परब जातील अरब येतील  -  राज ठाकरे

प्रश्‍न - कोकणाच्या विकासवाटेकडे तुम्ही कसे पाहता? 
उत्तर - कोकणात कशाचीच कमतरता नाही. जगात घडले ते इथे होऊ शकणार नाही, असे काहीच नाही. केरळात बघा. तेथील लोकांना, पर्यटनाचा अभिमान आहे. तसे प्रकल्प हवे, विकास असायला हवा. सरकार येणार आणि करणार यावर अवलंबून न राहता तुम्हालाही हातपाय हलवायला हवे. सरकारे येतील जातील येथील अनेक गोष्टी निर्यात करायला संधी आहे.

नितीन गडकरींनी सांगितले की, आम्ही महाराष्ट्राला साडेपाच लाख कोटी दिले. तुमच्याकडे पैसा आहे तर बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्राला कर्ज का काढायला लावता. 

प्रश्‍न - कोकणात प्रकल्पांना विरोध होण्याची कारणे काय?
उत्तर - प्रकल्पांबाबत इतर देशांसारखे आपल्याकडे धोरण नाही. प्रकल्पात तेथील भूमिपुत्रांना भागीदार बनवून घ्यायला हवे. येथे प्रकल्प आणताना भूमिपुत्राचा विचार होतो का? आमचे राज्यकर्ते परदेशात जातात. तेथे काही तरी बघतात. यांची पोर सांगतात ‘डॅडी डॅडी ते बघा’. हे इथे येतात आणि घोषणा करतात. प्रकल्पात जमीन गेली की भूमिपुत्राचे अस्तित्वच संपते. भूमिपुत्रांना प्रकल्पात भागीदार करून घ्यायला हवे.

मोदी भारताचे नाही गुजरातचेच पंतप्रधान आहेत. ते देशात थांबतच नाहीत. झाल्या निवडणुका की निघाले परदेशात. अलीकडे मी जगाच्या नकाशाचा गोल घेऊन बघतो कुठे जायचे राहिले?

प्रश्‍न - प्रकल्प जाहीर होण्याआधीच परप्रांतीय कोकणात जमिनी खरेदी करतात. याला जबाबदार कोण?
उत्तर - त्याला सरकार किंबहूना त्यातली यंत्रणा जबाबदार. कारण त्यांनाच याची माहिती असते. अमराठी लोक आधी कमरेतून वाकून येतील. हातपाय पसरतील. मंदिरात ट्रष्टी बनतील. आपला मतदार संघ बनवतील. आपली वर्तमानपत्रे काढतील. तुमचे अस्तित्वच हिरावून जाईल. मुलुंडमध्ये भाजी विक्रेत्याला किरीट सोमयांनी दादागिरी केली. ही परिस्थिती इथे यायला वेळ लागणार नाही.

जेवण तयार आहे ही माझी सगळ्यात आवडती पाटी. मालवणी जेवणाला सर्वांची पसंती असते; पण कोकणात चायनीजच्या गाड्या दिसतात. दक्षिणेकडील लोक आपल्या आहाराचा अभिमान बाळगतात; आपण मात्र आपल्याच जेवणाला कंटाळलोय.

प्रश्‍न - चाकरमान्यांच्या जमिनी जास्त प्रमाणात विकल्या जातात. त्याबद्दल काय सांगाल?
उत्तर - जमिन, मालमत्ता हे अस्तित्व असते. आत्तापर्यंत रामायण वगळता सर्व युद्ध जमिनीसाठी झाली. त्या विकून तात्कालीक फायदा मिळेल; पण अस्तित्व संपून जाईल. चाकरमानी नोकरी, व्यवसायात स्थिरावलेले असतात. त्यांनी गावाकडील जमिनी विकू नयेत. 

प्रश्‍न - नाणारबाबत काय सांगाल?
उत्तर - मी प्रगतीच्या विरोधात नाही; पण नाणार आणि बुलेट ट्रेनला माझा विरोध आहे. इतका प्रचंड खर्च करून गुजरातच्या फायद्यासाठी बुलेट ट्रेन आणली जातेय. नरेंद्र मोदी भारताचे नाही गुजरातचे पंतप्रधान आहेत. आधीच कर्जबाजारी महाराष्ट्र मोदींच्या हट्टासाठी बुलेट ट्रेनसाठी मोठे कर्ज काढणार आहे. आयआयएम अहमदाबादने बुलेट ट्रेन चालणे कठिण असल्याचा अहवाल दिला. राज्यकर्त्यांना आलेला झटका हे राज्याचे धोरण असू शकत नाही.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com