सहल ठरली जीवघेणी! देवगड समुद्रात बुडाले सैनिक अ‍ॅकॅडमीचे सहा विद्यार्थी; चौघींचे मृतदेह सापडले, एक बेपत्ता

सैनिक अ‍ॅकॅडमी (Sainik Academy) या प्रशिक्षण केंद्रामधील सहलीसाठी आलेले सहाजण येथील समुद्रात (Devgad Sea) बुडाले.
Sainik Academy Devgad Sea
Sainik Academy Devgad Seaesakal
Summary

एकूण ३२ प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षक आणि अन्य नातेवाईक असे एकूण ३६ जण सहलीसाठी आले होते.

देवगड : पिंपरी चिंचवड (Pune) येथील सैनिक अ‍ॅकॅडमी (Sainik Academy) या प्रशिक्षण केंद्रामधील सहलीसाठी आलेले सहाजण येथील समुद्रात (Devgad Sea) बुडाले. त्यातील चार तरुणींचा मृत्यू झाला. एकाची प्रकृती स्थिर आहे. अजूनही एकजण बेपत्ता आहे. ते सर्व सुमारे १९ ते २२ वयोगटातील प्रशिक्षणार्थी आहेत.

ही घटना काल (शनिवार) दुपारी तीनच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलिस, महसूल प्रशासनासह स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. मृतांमध्ये प्रेरणा रमेश डोंगरे (वय २१, घरकुल चिखली, पुणे), अंकिता राहुल गलाटे (२१, कृष्णानगर चिखली, पुणे), अनिषा नितीन पवळ (१९, चिखली ताह्मणेवस्ती, पुणे), पायल राजू बनसोडे (२१, घरकुल चिखली, पुणे) यांचा समावेश आहे. रामचंद्र घनःश्याम डिचोलकर (२२, कणकवली) बेपत्ता आहे.

Sainik Academy Devgad Sea
Mumbai-Goa Highway : उड्डाणपुलाचे गर्डर हटवताना महामार्गाची एक लेन बंद होणार? प्रशासन महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत

आकाश सोमाजी तुपे (२२, रुपीनगर, पुणे) याची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : पिंपरी चिंचवड (पुणे) परिसरातील सैनिक अ‍ॅकॅडमीमधील एकूण ३२ प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षक आणि अन्य नातेवाईक असे एकूण ३६ जण गुरुवारी (ता. ७) रात्री पुणे येथून सिंधुदुर्गात सहलीसाठी आले होते. यामध्ये १५ तरुणींचा समावेश आहे.

सर्वजण शुक्रवारी (ता. ८) सकाळी मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला पाहून सायंकाळच्या सुमारास कुणकेश्‍वर येथे मुक्कामासाठी आले. कुणकेश्‍वर येथे मुक्काम करून आज देवदर्शन आणि परिसर फिरून दुपारच्या सुमारास जेवण करून ते येथील पवनचक्की परिसरात आले. यातील सहाजण समुद्रात उतरले; मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. हा प्रकार किनाऱ्‍यावर असलेल्या इतर सहकाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली.

बुडणाऱ्‍या सर्वांना स्थानिकांच्या मदतीने वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. पोलिसांनाही माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून तहसीलदार आर. जे. पवार दाखल झाले. बुडणाऱ्या पाच जणांना पाण्याबाहेर काढण्यात स्थानिकांना यश आले. यासाठी जीवरक्षक हार्दिक कुबल, जितेश मोहिते, विष्णू धुरत, मंदार धुरत, अविनाश मोहिते आदींनी सहकार्य केले. त्यांना रुग्णवाहिकेच्या साहाय्याने येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले; मात्र त्यातील चार तरुणींचा मृत्यू झाला.

एकावर उपचार सुरू होते. दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी घटनास्थळी भेट दिली. बेपत्ता असलेल्या रामचंद्र डिचोलकर याचा शोध सुरू करण्यात आला होता. यासाठी नौकेची मदत घेण्यात आली. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते; मात्र तो सापडला नव्हता. काळोखामुळे शोधकार्य थांबविण्यात आले.

घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी समुद्रकिनारी गर्दी केली होती. नगराध्यक्षा साक्षी प्रभू आणि अन्य नगरसेवकांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेमुळे सहकारी प्रशिक्षणार्थींना धक्का बसला. सर्वांना येथील पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. स्थानिकांनी त्यांच्या चहापाण्याची व्यवस्था केली. घटनेची माहिती नितीन गंगाधर माने यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

तहसीलदार पवार, नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांच्यासह महसूल यंत्रणा घटनास्थळी कार्यरत होती. उर्वरित पर्यटक प्रशिक्षणार्थींच्या रात्रीच्या निवाऱ्‍याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली. अप्पर पोलिस अधीक्षक रावले पोलिस ठाण्यात होते. घटनास्थळी पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे, उपनिरीक्षक शकिल अहमद, हवालदार प्रशांत जाधव, फकरुद्दीन आगा, पोलिस नाईक विजय बिर्जे, पोलिस नाईक सांची सावंत, विशाल वैजल आदी उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालयात पोलिस उपनिरीक्षक सुधीर कदम व अन्य पोलिस कार्यरत होते.

Sainik Academy Devgad Sea
माणुसकी अजूनही जिवंत आहे! शेतकऱ्यांकडून कोणताही मोबदला न घेण्याचा ऊसतोड मजुरांचा निर्णय, सर्वत्र होतंय कौतुक

पहिलीच मोठी दुर्घटना

देवगड समुद्रात एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटक बुडाल्याची पहिलीच घटना होती. त्यामुळे घटनेची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. समुद्रकिनारा गर्दीने फुलून गेला होता. स्थानिकांनी बुडणाऱ्‍यांना वाचविण्यासाठी मदतीचा हात दिला. येथील ग्रामीण रुग्णालयातही अनेकांनी गर्दी केली होती.

असे आहेत उपाय

कोकणातील सागरी सुरक्षेचा प्रश्‍न सरकारने हाती घेणे आवश्यक आहे. कोकणात विशेषतः काही भागांतच समुद्र अतिशय धोकादायक आहे. या धोकादायक किनाऱ्‍यांचे सर्वेक्षण होऊन तातडीने सक्षम लाईफगार्ड व आधुनिक यंत्रणा तैनात करण्याची आवश्यकता आहे. विशेषतः रायगडमध्ये मुरुड, रत्नागिरीत गणपतीपुळे, सिंधुदुर्गात तारकर्लीमध्ये समुद्र अतिशय धोकादायक मानला जातो. या ठिकाणी आता काही प्रमाणात यंत्रणा कार्यरत असली तरी त्याला अधिक प्रभावी करणे आवश्यक आहे. इतर किनाऱ्‍यांकडे होणारी गर्दी लक्षात घेता सर्वदूर सुरक्षाव्यवस्था उभी व्हायला हवी.

Sainik Academy Devgad Sea
Road Accident : लग्न समारंभातून परतताना काळाचा घाला! सागरी महामार्गावर कारच्या धडकेत पाच वऱ्हाडी जखमी

सहल आखताना...

समुद्रकिनाऱ्‍यावर येणाऱ्‍या सहलींचे प्रमाण सध्या वाढले आहे. मुलांना समुद्राचे मोठे आकर्षण असते. त्यामुळे शिक्षकांनी मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. देवगड दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर ही बाब प्रकर्षाने उघड झाली आहे. सिंधुदुर्गमधील काही समुद्रकिनारेच जास्त धोकादायक आहेत आणि वारंवार एकाच ठिकाणी दुर्घटना घडतात. ही ठिकाणे समुद्री भोवऱ्‍यांमुळे धोकादायक बनली आहेत. या ठिकाणांची माहिती पर्यटकांना व्हावी, यासाठी तेथे लावलेले फलक खराब होणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे आहे.

सहल ठरली जीवघेणी

या सैनिक अ‍ॅकॅडमीमार्फत पोलिस भरतीपूर्व तयारीसाठी मैदानी प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये एकूण ५० प्रशिक्षणार्थी आहेत. त्यातील १५ महिला व १७ पुरुष असे मिळून एकूण ३२ प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षक आणि अन्य नातेवाईक असे एकूण ३६ जण सहलीसाठी आले होते. त्यातील चार तरुणींसह सहाजण पाण्यात बुडाले. यातील एकजण बेपत्ता असून, एक जण बचावला, तर एकाची प्रकृती स्थिर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com