आर्थिक, सामाजिक बदल कोकणातील शाळांच्या मुळावर
रत्नागिरी - ग्रामीण कोकणातील प्राथमिक शाळांचा घटता पट आणि त्याचा माध्यमिक शाळांवर होणारा परिणाम ही चिंतेची बाब आहे. अंतिमतः शाळा बंद होण्यात याचे पर्यवसान होते. बदलत्या काळाचे वास्तव स्वीकारताना ही परिस्थिती येण्यास आर्थिक सामाजिक कारणेही आहेत. हे बदल माध्यमिक शाळांच्या मुळावर येत आहेत.
ग्रामीण भागातील मुले शिकली, ती रोजगारासाठी बाहेर गेली, यामुळे गावे ओस पडू लागली. गावात तरुण पिढी राहात नसल्याने लहान मुले अगदीच कमी. याचा परिणाम प्राथमिक शाळांच्या पटसंख्या घटण्यावर होतो आहे. ग्रामीण भागात स्वयंरोजगार निर्माण झाला, येथील तरुण गावातच राहिला अथवा रोजगार संधी उपलब्ध झाल्या, शेतीत रोजगार मिळू शकला, तर तरुण बाहेर न जाता खेड्याकडे वळेल. ग्रामीण भाग ओस आणि शहराकडे वाटचाल ही कोकणातील स्थिती शाळांना मारक ठरत आहे, असे मार्मिक निरीक्षण ग्रामीण भागात गेली 26 वर्षे अध्यापन करणारे विजय पाटील यांनी नोंदले. राजापूर तालुक्यातील ताम्हानेसारख्या खेड्यात ते काम करतात.
हेही वाचा - महाभारताचा काळ हा ख्रिस्तपूर्व 5561 वर्ष
पाटील सर म्हणाले, ग्रामीण दुर्गम भागात इंग्रजी माध्यमाचा सोस हा प्रश्न नाही. तो शहरात आहे. येथील मुलांना इंग्रजी माध्यमाची कवाडेच खुली होत नाहीत. मात्र दिवसेंदिवस मुलांची संख्या कमी होत आहे. त्याचा परिणाम माध्यमिक शाळांच्या तुकड्या कमी होणे, शिक्षक संख्या कमी होणे, परिणामी काही शाळा बंद पडणे असा होतो आहे. या वेगाने हेच सुरू राहिले, तर सात ते आठ वर्षांत ग्रामीण भागातील 50 ते 60 टक्के माध्यमिक शाळांना बंद पडण्याचा धोका आहे.
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे पाटील अध्यक्ष आहेत. त्यांची निरीक्षणे थेट अनुभवावर आधारित आहेत. संघटनेच्या पातळीवर शाळा वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र सामाजिक परिस्थितीतील बदल लक्षात घ्यायला पाहिजे यावर त्यांनी जोर दिला. ताम्हाने येथील उदाहरण देताना ते म्हणाले, 26 वर्षे ते मुख्याध्यापक आहेत. सुरवातीला ताम्हानेतील मुले विखुरलेली होती. शाळेत फक्त 57 पट होता. मात्र शाळा सुस्थितीत आल्यावर, निकाल उत्तम लागल्यावर तो 225 वर गेला.
हेही वाचा - नाणारनंतर आता राजापुरात आयलॉगचे रण
उत्तम निकालानंतर गावाबाहेरच
शाळा बंदला कारणीभूत होणाऱ्या दुष्टचक्राचा हात आहे, असे सांगताना पाटील म्हणाले, उत्तम निकाल लागल्यावर पुढील शिक्षणासाठी अनेकजण शहरात गेले. चांगले गुण मिळवणारे विद्यार्थी उच्च शिक्षणाला बाहेर गेले. ते परत गावात फिरकले नाहीत. खेड्यातून बाहेर गेलेल्यांना इंग्रजी माध्यमातून शिकण्याची संधी पुढील पिढीसाठी खुणावत होती. यामुळे आधी प्राथमिक व नंतर माध्यमिक शाळांचा फ्लो कमी झाला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.