राजापूर : मुंबईतील नोकरी सोडून कोकणात घरी परतलेल्या तरुणाने गावामध्ये अळंबी उत्पादन व विक्रीचा व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचा आर्थिक उत्पन्नाचा मार्ग स्वतःच शोधला आहे. तालुक्यातील केळवडे येथील अनंत वाडेकर या तरुणाने अळंबीचा व्यवसाय सुरू करून त्यात यश मिळवले आहे.
शालेय आणि माध्यमिक शिक्षण घेतानाच स्वतःचा छोटा व्यवसाय उभारण्याचे वाडेकर यांचे स्वप्न होते. शेतीक्षेत्राची आवड असलेल्या अनंत यांनी कृषी सहलींतून अनेक कृषी क्षेत्रांना भेटी दिल्या. त्यांनी काजू प्रक्रिया उद्योग उभारण्याचा ध्यास घेतला होता. त्यासाठी आवश्यक भांडवल गाठीशी नसल्याने त्यांचे स्वप्न अधुरे राहिले. त्याच निराशेतून त्यांनी मुंबईची वाट धरली. तेथील घुसमटीतून सुटका करून घेताना गावी परतले. येथे मशरूम व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. मुंबई येथे प्रशिक्षण घेऊन पाच किलो बियाणे घेऊन परत आले. अळंबी उत्पादन घेण्यासाठी बर्यापैकी शेड लागते; मात्र, कमी पैशामध्ये उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीचा कुशलतेने उपयोग करून अनंत यांनी व्यवसायाचा शुभारंभ केला. पाथर्डे येथील घराशेजारी गुरांचा गोठा साफसफाई करून त्यामध्ये अळंबी व्यवसायाचा शुभारंभ केला.
जैविक आणि हँगिंग पद्धतीने ऑयस्टर अळंबीचे उत्पादन घेताना कमी खर्चामध्ये जादा उत्पन्न घेण्यावर त्यांनी भर दिला. अळंबीच्या उत्पादनासाठी त्यांनी राजापूर आणि लांजा येथील स्थानिक बाजारपेठेसह आठवडा बाजार, वैयक्तिक संपर्क याचा उपयोग करताना सोशल मीडियाचाही खुबीने उपयोग केला. त्या बळावर गेल्या वर्षभरामध्ये चांगले यश मिळाल्याचे त्यानी सांगितले. वाडेकर यांनी आता स्वतंत्र शेड बांधली असून त्यातून खर्या अर्थाने प्रयोगाला व्यावसायिक स्वरूप दिले आहे.
संपादन- अर्चना बनगे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.