चिपळूण : कोकणातील बळीराजा कठीण व अस्मानी संकटात पुरता उध्वस्त झाला आहे. त्याच्या पाठीशी आपण सर्वच लोकप्रतिनिधींनी उभे राहिले पाहिजे. ही वेळ सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची आहे. कोकणातील शेतकर्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी सर्वांजण एकत्र येऊ असे आवाहन गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी कोकणातील सर्वपक्षीय आमदारांना केले आहे.
हेही वाचा - परराज्यातील १५० नौका परतीच्या प्रवासाला -
ते म्हणाले, नुकतेच मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. अतिवृष्टीमुळे कापलेल्या पिकांचे नुकसान झाले. शेतामध्ये कापून ठेवलेली पिकं डोळ्यादेखत वाहून गेली आहेत. याची तातडीने दखल घेवून राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संबंधित शासकीय अधिकार्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे गुहागर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यांमध्ये महसूल विभाग व कृषी विभाग यांनी संयुक्तपणे पंचनामे करण्यास सुरूवात केले आहे.
हेही वाचा - कोकणात घरात सापडली दहा किलो वजनाची घोरपड -
आपल्याकडे ज्यावेळी शेती गर्भामध्ये येते त्याचवेळी सतत पाऊस पडत होता. त्यामुळे भात किंवा नाचणी यांच्या लोंबीवर किंवा कणसांवर दाणे दिसत असले तरी ते भरीव राहत नाहीत. याचाही विचार पंचनामे करतेवेळी संबंधित अधिकार्यांना करण्यास मी सांगितले आहे. कोकणातील प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागांत फिरून शेतकर्यांमध्ये प्रबोधन करावे आणि अधिकचे पंचनामे करून घ्यावेत, जेणेकरून या संकटात उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्यांना ठाकरे सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळवून घेण्याकरता अधिक सोयीचे होईल. याविषयी मी सातत्याने अधिकारी व कर्मचारी यांच्याशी बोलत आहेच, परंतु काही अडचणी असल्यास माझ्याशी संपर्क साधावा. असे आवाहन आमदार जाधव यांनी केले.
संपादन - स्नेहल कदम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.