हापूसला हवा मदतीचा हात

हापूसला हवा मदतीचा हात

swt३१५.jpg
८०२११
देवगडः येथील परिविक्षाधीन तहसीलदार स्वाती देसाई यांना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी निवेदन दिले. यावेळी नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर उपस्थित होते. (छायाचित्र ः वैभव केळकर)

हापूसला हवा मदतीचा हात
राष्ट्रवादीची मागणीः देवगडात प्रशासनास निवेदन सादर
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३ः निसर्गाच्या अवकृपेमुळे हापूस आंबा पिकाची अद्याप धीमी वाटचाल सुरू आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या तालुक्यातील आंबा बागायतदारांना शासनाने मदतीचा हात देण्यासाठी तालुका राष्ट्रवादीने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. याबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यासाठी येथील परिविक्षाधीन तहसीलदार स्वाती देसाई यांच्याकडे दिले.
यंदा हापूस आंबा उत्पादनाची अद्याप म्हणावी तशी घौडदौड नाही. झाडांना मोहोर येण्याचे प्रमाण कमी असल्याने हंगामाबाबत अद्याप स्पष्टता दिसत नाही. याबाबत मशागत, फवारणीवरील खर्चाच्या ओझ्याखाली दबलेल्या बागायतदार शिष्टमंडळाने आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन दिले.
यावेळी घाटे यांच्यासह तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव, मोंड उपसरपंच अभय बापट, नीलेश पेडणेकर, विनायक जोईल, सुहास नाणेरकर, चंद्रकांत पाळेकर, शामकांत शेटगे, शरद शिंदे, नागेश आचरेकर यांच्यासह अन्य उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, तालुक्याची संपूर्ण अर्थव्यवस्था हापूस आंब्यावर अवलंबून आहे. हापूसचे उत्पादन चांगले झाल्यास पूरक व्यवसायांना चालना मिळते; मात्र यंदा अवकाळी पाऊस, अवेळी सुटलेला वारा, थंडीचे कमी-अधिक प्रमाण तसेच अधूनमधून होणारे ढगाळ हवामान यामुळे यंदाचा आंबा हंगाम अडचणीत सापडला आहे. पाऊस चांगला झाल्याने आंबा हंगामाच्या दृष्टीने बागायतदार शेतकर्‍यांनी जून, जुलैमध्ये झाडांची चांगली मशागत केली. खत व्यवस्थापनावर बराच खर्च केला. पाऊस गेल्यानंतर पडलेल्या थंडीमुळे आंबा कलमे मोहोरण्याच्या आशेने आंबा बागायतदार शेतकर्‍यांनी फवारणी करण्यास सुरुवात केली; मात्र आंबा कलमांना मोहोर येण्याऐवजी पालवी फुटली. तरीही आंबा बागायतदार शेतकर्‍यांनी फवारणी सुरूच ठेवली; मात्र आलेली पालवी जून होऊन बरेच दिवस उलटले तरीही अजून कलमांना मोहोर आलेला नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून केलेली फवारणी वाया गेली आहे. औषधांच्या वाढलेल्या किंमती, फवारणीवर होणारा वाढीव खर्च यामुळे आंबा बागायतदार शेतकरी आता आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जानेवारी महिना उलटून गेला तरीही तालुक्यातील आंबा कलमे अजूनही मोहोरलेली नाहीत. काही निवडक आंबा बागायतदारांकडे पहिल्या टप्प्यातील सुमारे १० ते १५ टक्केच आंबा उत्पादन झाले आहे. उर्वरित बागायतदारांचा विचार करता तालुक्यात आतापर्यंत सुमारे १५ टक्केच झाडांना मोहोर आलेला आहे. आंबा बागायतदारांचा फवारणी खर्च अचाट झाला आहे. किटकनाशकांच्या वाढत्या दरामुळे खर्चाचे प्रमाण वाढत आहे. यातून आंबा बागायतदार आर्थिकदृष्ट्या सावरणे कठीण आहे. गेल्यावर्षी फळमाशीने आंबा पिकाचे मोठे नुकसान केले होते. तर यंदा निसर्गाच्या अवकृपेमुळे अजूनही कलमे मोहोरलेली नाहीत. त्यामुळे बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. यानंतर कलमे मोहोरली तरी पीक उशिराने येणार असल्याने दराची घसरण होईल. त्यामुळे यातून तालुक्यातील आंबा बागायतदार शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी सद्यस्थितीत आंबा कलमांची कृषी विभागामार्फत तातडीने पाहणी करून बागायतदारांना भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी तालुक्यातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीकडे देवगड तालुका राष्ट्रवादीच्या पक्षाच्यावतीने लक्ष वेधण्यात आले आहे.

चौकट
कृषी विभागाला निवेदन सादर
आंबा हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर तालुका कृषी विभागालाही शिष्टमंडळाने निवेदन दिले. मंडळ कृषी अधिकारी ऋषिकेश उल्फे, प्रसाद भोसले यांच्याशी नंदकुमार घाटे यांनी चर्चा केली. शासनाने वेळीच दखल घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com