
वडगाव-कोतवाल जोड रस्त्याचे काम रखडले
वडगाव-कोतवाल जोड रस्त्याचे काम रखडले
मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली ; महाराष्ट्र दिनी उपोषणाचा इशारा
खेड, ता. 20 : रत्नागिरी व रायगड जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या वडगाव ते कोतवाल गावांना जोडणारा जोडरस्ता व्हावा, यासाठी दोन्ही बाजुच्या ग्रामस्थांचा गेल्या तीन वर्षांपासून शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे. मात्र जोडरस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
वडगाव ते कोतवाल हा मार्ग निसर्गरम्य परिसरातून जात असून हा रस्ता पूर्णत्वास गेल्यास रस्त्याचे पर्यटनाच्या दृष्टीने महत्व वाढणार आहे. वडगाव खोऱ्यात अनेक छोटी-मोठी प्रेक्षणीय स्थळे आहेत. या स्थळांचा पर्यटनातून विकास होण्यास मदत होणार आहे. वडगाव ते कोतवाल रस्ता होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत मोरे गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा करत आहेत. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी वडगाव ते कोतवाल रस्त्याचा सर्व्हे करून पाहणी अहवाल सादर करण्याचे आदेश चिपळूण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी यांनीही अनेकदा स्मरण पत्रे सार्वजनिक बांधकाम विभागास पाठवून देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दखलच घेत नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने वडगाव ते कोतवाल रस्त्याचा सर्व्हे करून पाहणी अहवाल शासनाला सादर न केल्यास 1 मे रोजी येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा महाराणी अहिल्यादेवी समाजप्रबोधन मंचचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी दिला आहे.