Jal Jeevan Mission : ‘जलजीवन’ची विहीर कोरडीच
नेरळ : कर्जत तालुक्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र ठेकेदारांकडून कामे संथ गतीने सुरू असून प्रशासनाच्या नियोजनाअभावी पाणीटंचाई ‘जैसे थे’आहे. पेठ येथे जलजीवन योजनेच्या माध्यमातून विहीर खोदण्यात आली, मात्र पाणीच न लागल्याने प्रशासनाकडून काम थांबवण्यात आले. अखेर योजना संकटात सापडू नये, म्हणून खोदलेली विहीर पाणी साठ्यासाठी आम्हाला नीट बांधून द्या, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामीण भागातील प्रत्येक घरात २०२४ पर्यंत नळाद्वारे पाणी पोहचवण्यासाठी केंद्र सरकारने ‘हर घर नल से जल’ ही योजना आणली. रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे. कर्जत तालुक्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून एकूण १२९ योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. यात बहुतेक ठिकाणी कामे सुरू झाली आहेत.
तालुक्यातील अति दुर्गम भाग असलेल्या पेठ गावातही पाणी योजनेचे काम सुरू करण्यात आले. पेठ गाव डोंगरावर वसले आहे. गावात २० तर आदिवासी वाडीत २० अशी साधारण ४० घरे आहेत. आंबिवली येथून किमान ५ किमीचा डोंगराला वळसा घालून पेठला जाता येते. तर येथून जवळच कोथळीगडावर पोहचता येते. आजवर कोथळीगडावरील पाण्याच्या कुंडावर ग्रामस्थ गुजराण करत आहेत. मात्र तेथून पाणी आणणे, दिवसेंदिवस जिकरीचे झाले आहे.
गावात १४ नोव्हेंबर २०२२ रोजी सुमारे ४५ लाख रुपये खर्चून जलजीवन मिशन योजनेंतर्गत काम सुरू करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभाग कामावर लक्ष ठेवून आहे. कामाच्या उद्भव विहरीसाठी भूजल सर्वेक्षण विभागाने कातळ भाग असलेल्या ठिकाणी अवघ्या ३५ फुटांवर पाणी लागेल, असा अहवाल दिला. त्यामुळे ठेकेदाराने ४२ फूट विहीर खोदली, मात्र पाणी लागले नाही, तर दगड आणि धूळच निघत राहिली. अखेर लघु पाटबंधारे विभागाने काम थांबवले.
कोथळी गडावरील पाण्याचा आधार
पेठ गावात वीज पोचली असली तरी पाण्याची समस्या कायम आहे. गावासाठी दोन विहिरी आहेत. तर इतर चार ते पाच विहिरी फार्महाऊस मालकांनी त्यांच्यासाठी खोदल्या आहेत. मात्र कुठल्याच विहिरीला पाणी नाही. पूर्वी महिला कोथळीगडावरील कुंडातून पाणी आणायच्या मात्र आता जलवाहिनीद्वारे विहिरीत सोडले आहे.
पेठ गाव कातळात वसल्याने विहिरीला पाणी लागण्याची शक्यता कमीच आहे. ग्रामपंचायतीने तलावासाठी जागा घेऊन निम्मे काम केले. लघुपाटबंधारेने उर्वरित काम करावे. त्यानंतर ग्रामपंचायत तलावाची खोली वाढवणे, गाळ काढणे ही कामे करेल.
- दत्तात्रेय पिंपरकर, सरपंच, जामरुंग ग्रामपंचायत
पूर्वी गडावरील कुंडातून पाणी डोक्यावर खाली आणायचो, आता पाईपने पाणी विहिरीत भरल्यावर आम्हाला मिळते. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू केलेले तलावाचे कामही अपूर्णच आहे.
- अनुबाई सावंत, ग्रामस्थ
पेठ गावात पाणी योजनेचे काम सुरू होते, मात्र विहिरीला पाणी लागले नाही. आता भूजल सर्वेक्षण विभागाशी चर्चा करून अन्य पर्यायांचा विचार सुरू आहे. जवळच वनविभागाच्या जागेतील झऱ्यातून पाणी आणता येईल का, याचा विचार सुरू आहे.
- सुरेश इंगळे, उपअभियंता, लघु पाटबंधारे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.