देवगडमध्ये पाण्यासाठी टाहो
पाणी विकत घेण्याची देवगडवर वेळ

देवगडमध्ये पाण्यासाठी टाहो पाणी विकत घेण्याची देवगडवर वेळ

03064
देवगड ः येथील शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती असते.


देवगडमध्ये पाण्यासाठी टाहो

तीव्र टंचाईमुळे विकत घेण्याची वेळ; जलवाहिनीतील बिघाडामुळे अनियमित पुरवठा

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १५ ः येथील देवगड जामसंडे शहरातील नागरिक नळ योजनेच्या पाणी समस्यांनी सध्या ग्रस्त आहेत. नळयोजनेचे शहरात दिवसआड येणारे पाणी सध्या पाच दिवसांनीसुद्धा येत नसल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळण्याची वेळ आली आहे. योजनेच्या मुख्य जलवाहिनीमध्ये वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे पाणी पुरवठा अनियमित होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळी हंगामात नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.
येथील शहरात काही नागरिकांकडे विहीर, विंधन विहीर नसल्याने त्यांना नळयोजनेच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागते. तर काहींकडे पाण्यासाठी विहीरीची सोय असली तरीही ऐन उन्हाळी हंगामात विहीरीच्या पाण्याची पातळी खाली जाते, विहीरी आटतात. पर्यायाने त्याही नागरिकांना नळयोजनेच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागते. शहरातील नागरिकांना दिवसआड पाणी पुरवठा केला जातो. मात्र सोडण्यात येणारे पाणी केवळ तासभरच असल्याने नागरिकांना पाणी पुरवून वापरावे लागत आहे. त्यातच आता उन्हाळी हंगामात पाणी वितरणातील अनियमितता वाढली आहे. दिवसआड येणारे पाणी काहीवेळा आठवड्यातून केवळ दोन किंवा एकवेळच सोडले जात असल्याचे चित्र आहे. येणारे पाणी अपुर्‍या आणि कमी दाबाने येत असल्याने तासभर पाणी सोडले तरीही ते सुमारे पाचशे लीटरही येत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. सध्या नळयोजनेच्या पाण्याची अनियमितता वाढल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. यामध्ये गृहिणींची मोठी पंचाईत होत असल्याचे चित्र आहे. शहरातील काही भागात गुरूवारी तर काही भागात शुक्रवारी पाणी आले होते; मात्र आता पाच दिवस उलटूनही पाणी आले नसल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नळयोजनेच्या मुख्य जलवाहिनीला गळती असल्याने पाणी पुरवठा अनियमित होत असल्याचे देवगड जामसंडे नगरपंचायत प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, अलीकडच्या काही दिवसात योजनेमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने नागरिक अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत. विहीरीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने अशा नागरिकांना उन्हाळी हंगामापुरते नळयोजनेचे पाणी अपेक्षित असताना त्याहीवेळी पाण्याची अशी बोंबाबोंब होत असल्याने नळयोजना हवीच कशाला? असा सूरही ग्राहकांमधून उमटत आहे. सध्या शहराच्या काही भागात ग्राहकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे खर्चाचा भुर्दंड वाढला आहे.
..........
चौकट
बिले मात्र सुरुच
नळयोजनेचे पाणी अनियमित आणि पुरेसे येत नसले तरीही किमान पाणी वापराचा निकषं लावून अवाजवी बील आकारणी केली जात आहे. पाणी नाही आणि बील मात्र येत असल्याने नागरिक संतापले आहेत. त्यामुळे उन्हाळी हंगामात पाणी देऊ शकत नसाल तर बीलेही काढू नका, अशी ग्राहकांची मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com