‘वंदे भारत’`कोकण रेल्वे मार्गावर सुस्साट...

‘वंदे भारत’`कोकण रेल्वे मार्गावर सुस्साट...

०३१५७
रत्नागिरी ः रत्नागिरी रेल्वेस्थानकावर दाखल झालेली वंदे भारत एक्स्प्रेस. (छायाचित्र ः तन्मय दाते)

‘वंदे भारत’ कोकण रेल्वे मार्गावर सुसाट...
---
मुंबई-मडगाव प्रवास आता सहा तास ५७ मिनिटांत; जूनपासून धावणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : देशभरात जवळपास १४ मार्गांवर धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस कोकण रेल्वेमार्गावर कायमस्वरूपी चालविण्यासाठी आज चाचणी घेण्यात आली. या सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसने मुंबई ते मडगाव ५७५ किलोमीटरचे अंतर अवघ्या सहा तास ५७ मिनिटांत पार केले. छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटलेली ही रेल्वे दुपारी निर्धारित वेळेपेक्षा आधीच मडगावला पोचली.
रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार कोकण रेल्वेमार्गावर चालविण्यात येणाऱ्‍या वंदे भारत एक्स्प्रेससाठी आज पहाटे मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून ट्रायल रन घेण्यात आली. मुंबई ते शिर्डी ही १६ डब्यांची गाडी मंगळवारी शिर्डीला सोडली जात नाही. त्यामुळे आज ती कोकण रेल्वेमार्गावर चालविण्यात आली. सीएसएमटी येथून पहाटे पाच वाजून ५३ मिनिटांनी ही गाडी मडगावच्या दिशेने रवाना झाली. पुढील काही दिवसांत मुंबईतून चिपळूण, रत्नागिरी तसेच गोव्याकडे वातानुकूलित आणि वेगवान वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करता येणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेसने मुंबई ते रत्नागिरी हे अंतर अवघ्या चार तास २७ मिनिटांत, तर पनवेल ते रत्नागिरी हे अंतर जवळपास तीन तासांत पूर्ण केले.
दुपारी एक वाजून १३ मिनिटांनी वंदे भारत एक्स्प्रेस मडगाव येथून मुंबईसाठी रवाना झाली. या चाचणीसाठी कोकण रेल्वेची मेन लाईन खुली ठेवण्यात आली होती. आज मुंबई-मडगाव चाचणीसाठी धावलेल्या हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसने हे अंतर अवघ्या सहा तास ५७ मिनिटांत पार केले. या गाडीची अजून चाचणी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण होईल.
------
चौकट
अन्य एक्स्प्रेसला लागणारा वेळ
तेजस- ८ तास ५० मिनिटे
कोकणकन्या- १० तास ४१ मिनिटे
जनशताब्दी- ९ तास
मांडवी- १२ तास
----
चौकट
दीड हजार मीटरचे अंतर ५३ सेकंदात पार
बुलेट ट्रेनचे स्वप्न अपुरे असले तरी देशातील सर्वांत अत्याधुनिक आणि सेमी स्पीड अशी वंदे भारत एक्स्प्रेसची आज चाचणी घेण्यात आली. मुंबई ते शिर्डीदरम्यान धावणाऱ्‍या गाडीला साप्ताहिक सुटी असल्याने ती येथे चालविण्यात आली. रत्नागिरी स्थानकातून ही गाडी १०.२३ मिनिटांनी गोव्याकडे रवाना झाली. रत्नागिरी ते निवसर मार्गावरील पोमेंडीतील महालक्ष्मी पूल, बाणेवाडी बोगदा आणि पानवलचा मोठा पूल असे एक हजार ५७० मीटरचे अंतर या गाडीने अवघ्या ५३ सेकंदात पार केले, असे रत्नागिरीतील अभ्यासक उदय बोडस यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com