
अनुत्तीर्ण मुलांना शिक्षण प्रवाहात आणा
अनुत्तीर्ण मुलांना शिक्षण प्रवाहात आणा
अॅड. विलास पाटणे; दहावीत ६.१७ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत ६.१७ टक्के विद्यार्थ्यांच्या कपाळावर अनुत्तीर्णतेचा शिक्का बसला आहे. परंतु ते प्रवाहाच्या बाहेर फेकले जाऊ नये याकरिता त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी केले.
आज दहावीचा निकाल जाहीर झाला. यानिमित्ताने त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना सन्मानाने जगण्याचा हक्क नाकारला जातो. मूल्यमापनाचा हेतू केवळ विद्यार्थ्याचे मुल्यमापन करणे नसून अध्ययन व अध्यापन प्रक्रियेचे मुल्यमापन करणे व सुधारणेचा आहे. शैक्षणिक सत्राच्या सुरवातीपासून मनावर अपेक्षांचे ओझे असल्याने विद्यार्थी तणावग्रस्त राहतात. २०२१ मध्ये महाराष्ट्रात १८३४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. अशावेळी सारी शिक्षणव्यवस्था अनुत्तीर्ण झाली आहे, असं म्हणण्यास वाव आहे.
अॅड. पाटणे म्हणाले की, कोकण मंडळाचा विचार करता नियमित बसलेल्या २७९२३ विद्यार्थ्यांपैकी २७३९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व ५२७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये ४४४ पैकी ३२७ उत्तीर्ण व ११७ अनुत्तीर्ण झाले. २०१३ साली स्थापन झालेले कोकण विभागीय मंडळ ९८.११ टक्के गुण मिळवून महाराष्ट्र राज्यातील नऊ विभागात सर्वप्रथम आले. सातत्याने सर्वाधिक निकाल लावण्याची परंपरा कोकण बोर्डाने कायम राखली आहे. मुलींनी आपली आघाडी कायम राखली आहे. दहा हजार शाळांचा निकाल १०० टक्के लागल्याबद्दल विशेष अभिनंदन. शाळा या बौद्धिक कोंडवाडे न राहता सृजनशील निर्मितीचे व्यासपीठ झाले तर हरवलेला शिक्षणाचा हेतू आपण परत मिळवून देवू शकतो.