गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांबाबत काय आहे सरपंच संघटनेची भूमिका

corona
corona

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीचे इतिवृत्त सरसकट रद्द करण्यावरून आणि गणेशोत्सवासाठी गावात येणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रश्‍नावरून सरपंच संघटना आक्रमक झाली आहे. जिल्ह्यातील सरपंचांशी चर्चा केल्याशिवाय असे कोणतेही निर्णय घेतल्यास आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल किंवा प्रसंगी आम्ही पदाचे सामूहिक राजीनामे देऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे. सरपंच संघटना, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई, सचिव दादा साईल, संतोष राणे यांनी म्हटले आहे. 

पत्रकात म्हटले आहे की, कोरोना संकटात गावात आलेल्या आणि येऊ पाहणाऱ्या तसेच गणपतीसाठी येणाऱ्या चाकरमानी लोकांच्या सेवेसाठी गावातील नियंत्रण समिती अध्यक्ष असलेले सरपंच तत्पर आहेत. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेवरून यात शिफारस केलेल्या निर्णय किंवा नियमांना सरपंचांची तत्वतः मान्यता आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्याशी जिल्हा सरपंच संघटनेची तशी चर्चादेखील झालेली आहे, परंतु काल पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या शांतता समितीच्या बैठकीमध्ये हे इतिवृत्त सरसकट रद्द करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील सरपंचांशी चर्चा केल्याशिवाय असे कोणतेही निर्णय घेतल्यास आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल किंवा प्रसंगी आम्ही अध्यक्षपदाचे सामूहिक राजीनामे देऊ. 

गणपतीसाठी गावात येणाऱ्या लोकांना निर्बंध असणे गरजेचे आहे; अन्यथा गावागावांत भांडणे होतील, याची जबाबदारी कोण घेणार ते संबंधितांनी स्पष्ट करावे. कारण गेल्या चार महिन्यांत नियंत्रण समिती म्हणून किंवा सरपंच म्हणून गावात येऊन नियम मोडणारे किंवा समितीला असहकार्य करणाऱ्या लोकांविरोधात दिलेल्या तक्रारी पोलिसांनी दाखल केल्या नाहीत आणि दाखल झालेल्या तक्रारी न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी शिफारस केलेल्या नियमांचे इतिवृत्त सरसकट रद्द करू नये. कालच्या शांतता समिती बैठकीमध्ये ग्राम पातळीवरचे अधिकार सरपंच यांना दिल्यामुळे खूप अडचणी, भांडणे होतात, अशी भूमिका मांडली, असे आम्हाला कळाले आहे. अशाप्रकारची भूमिका असेल तर आम्ही त्याचे स्वागत करतो आणि संनियंत्रण समितीच्या अध्यक्ष पदावरून कार्यमुक्त करून शांतता समितीच्या मान्यतेने इतर कोणाचीही नियुक्ती करावी. सरपंच म्हणून आम्हाला प्राप्त असणारी कर्तव्ये आम्ही निश्‍चित पार पाडून शासनास सहकार्य करू. 

चाकरमान्यांना विरोध नाही

 पालकमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची काळजी घेण्यासाठी प्रशासनाला शेवटी ग्रामीण पातळीवर ग्राम नियंत्रण समितीच सहकार्य करणार आहे. त्यामुळे सरपंचांशी चर्चा करून मगच येणाऱ्या लोकांसाठी नियमावली ठरविण्यात यावी. कोकणात येणाऱ्या सर्व चाकरमान्यांची विशेष काळजी घेण्याची आणि चाकरमान्यांनी गणपतीला आलेच पाहिजे, ही आमचीही भूमिका आहे. त्यांना कोकणात येण्यास कोणाचाही विरोध नाही, असेही या संघटनेचे पत्रकात म्हटले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com