रत्नागिरी : कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर प्रथम वाचनालये बंद झाली. परंतु आज बहुतेक सर्व सेवा पूर्वपदावर आल्या आहेत, मात्र वाचनालयांना लागलेली कुलपं तशीच आहेत. सुमारे साडेपाच महिने बंद असल्याने वाचकही अस्वस्थ आहेत. आता तरी राज्य शासनाने सूचना आणि नियमावली जाहीर करून वाचनालये चालू करावीत, अशी मागणी 192 वर्षे जुन्या रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केली.
वाचनालयांत अनेक वाचकांचे सातत्याने फोन येत असून वाचनालय कधी सुरू करणार असे विचारत आहेत. 5 महिने वाचनालयांचे उत्पन्न पूर्ण बंद आहे. परंतु पगार, लाईट बिल, पाणी बिल, मेंटेनन्स आदी खर्च सुरू आहेत. वाचनालयाची ग्रंथ संपदा सुरक्षित ठेवण्याची कसरत करावी लागत आहे. वाचनालये बंद झाल्यामुळे वाचनालयातील सभासदांना वितरित केलेली पुस्तके सभासदांकडे 5 महिन्यांपेक्षा जास्त काळ पडून आहेत. ही पुस्तके परत प्राप्त करण्याचे आव्हान वाचनालयांसमोर आहे.
काही सभासद प्रामुख्याने विद्यार्थी, अन्य राज्यात स्थलांतरित झालेले सभासद यांच्याकडील पुस्तके प्राप्त करण्यासाठी खूप अडचणी येणार आहेत, असे अॅड. पटवर्धन यांनी सांगितले. ग्रंथालये ही समाज मानसिकता सुदृढ ठेवतात. त्या संबंधित शहराची वैभव ठरणारी ग्रंथालये शासनाने दुर्लक्षित करू नये. वाचकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये, असा इशाराही अॅड. पटवर्धन यांनी दिला आहे. वाचनालये नियमित सुरू करण्यासाठी आवश्यक आदेश शासनाने तात्काळ घ्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
सुरक्षेच्या उपाययोजना
वाचनालयात गर्दी होणार नाही. शिस्तीत पुस्तक वितरण होईल. जमा होणारी पुस्तके 24 तास स्वतंत्र ठेवली जातील. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स राखले जाईल. कोणताही गर्दीचा, सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रम केला जाणार नाही. गरजेनुरूप ज्येष्ठांना घरपोच पुस्तके दिली जातील. या सुरक्षेच्या उपाययोजना करून वाचनालये सुरू करता येतील.
संपादन - स्नेहल कदम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.