गणपतीपुळेतील कमानीचे बांधकाम चुकीचे; काम थांबविण्याच्या सूचना 

गणपतीपुळेतील कमानीचे बांधकाम चुकीचे; काम थांबविण्याच्या सूचना 

रत्नागिरी - गणपतीपुळे विकास आराखड्यामधून मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील बांधण्यात येणाऱ्या कमानीचे बांधकाम चुकीच्या पद्धतीचे आहे. सात मीटरचा रस्ता असून पाच मीटरची कमान बांधली जात आहे. त्याच्या भिंती तिरक्‍या असून पोलिस चौकीच्या खोल्याही छोट्या आहेत. ही बाब स्थानिक ग्रामस्थांनी लक्षात आणून दिली. जिल्हा प्रशासनानेही कमानीचे काम थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. चुकीचे काम करणाऱ्या शाखा अभियंता, उपअभियंत्यांवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, असे म्हाडाध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी सांगितले. 

गणपतीपुळे विकास आराखड्यातील कामांचा आरंभ करताना आमदार सामंत यांना विश्वासात न घेता परस्पर कामे सुरू केल्यामुळे पंचायत समिती सदस्य गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मालगुंडमधील शिवसैनिकांनी ती बंद पाडली होती. त्यांच्या भावना लक्षात घेऊन विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आमदार सामंत यांनी गणपतीपुळे येथील एमटीडीसी सभागृहात बैठक घेतली.

बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत आमदार सामंत म्हणाले, ""गणपतीपुळे विकास आराखड्याला निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा केला असून त्याला 100 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या कामाचे भूमिपूजन होणार होते; मात्र प्रत्यक्षात कामही सुरू झाले होते. स्थानिकांना विश्वासात न घेताच ही कामे सुरू करण्यात आली होती. याचा जाब अधिकाऱ्यांना विचारला. सध्या काम सुरू असलेली कमान रस्त्याच्या आतमध्ये बांधली जात आहे. तसेच ती वाकडी असून अवाढव्य आहे. भिंत तिरकी असल्याचे ओळंबा लावून पहा, अशा सूचना केल्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर काम थांबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. भूमिपूजन करण्यामागचा आमचा हाच हेतू होता. जेणेकरून या कामांवर लक्ष ठेवणे शक्‍य होते. कमानीसाठी 40 लाख रुपये मंजूर आहेत. प्रत्यक्षात चार लाखांचेही काम झालेले नाही. याला जबाबदार असलेल्यांकडून झालेल्या कामाचे पैसे वसूल करून घ्यावेत आणि त्यांचे निलंबन करावे अशी मागणी केली आहे.'' 

पर्यटन करातून जीवरक्षकांना मानधन 
मानधन देता येत नसल्यामुळे ग्रामपंचायतीने किनाऱ्यावरील जीवरक्षकांना ब्रेक दिला होता. त्यानंतर पावसाळ्यात येणाऱ्या पर्यटकांना जीव गमवावा लागला. पोहायला जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीवरक्षक आवश्‍यक आहे. प्रशासनाकडूनही याची गंभीर दखल घेण्यात आलेली नव्हती. मानधनाच्या प्रश्‍नावर आमदार सामंत यांनी उत्कृष्ट तोडगा काढला आहे. पर्यटकांकडून घेण्यात येणाऱ्या लाखो रुपयांच्या करामधून मानधनाची रक्‍कम देणे ग्रामपंचायतीला सहज शक्‍य आहे. त्याची अंमलबजावणी तत्काळ करणे आवश्‍यक आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com