Axar Patel IND vs AUS 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा दुसला दिवस सुरू झाला त्यावेळी नॅथन लयॉनने भारतीय फलंदाजीला भगदाड पाडण्यास सुरूवात केली. कांगारूंच्या फिरकीपुढे भारताची अवस्था 7 बाद 139 अशी झाली. कांगारूंना सामना आपल्या हातात आल्यासारखे वाटले. मात्र कांगारूंसाठी हे मृगजळ ठरले. अक्षर पटेल त्यांच्या आडवा आला.
कारण भारताची फलंदाजी ही हनुमानाच्या शेपटीसारखी आहे संपतच नाही! भारताचे 7 फलंदाज तंबूत गेले असताना अक्षर पटेल आणि अश्विन यांनी आठव्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाचा मोठी आघाडी घेण्याचा मनसुबा उधळून लावला. भारताने पहिल्या डावात 262 धावा केल्या. यात अक्षर पटेलच्या 74 धावांचे मोलाचे योगदान होते. अश्विनने 37 तर विराट कोहलीने 44 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात अवघ्या 1 धावेची आघाडी मिळाली.
भारताने आपला पहिला डाव बिनबाद 21 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली. मात्र ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लयॉनने भारतीय फलंदाजीला भगदाड पाडण्यास सुरूवात केली. नॅथन लयॉनने एकट्याने भारताचा बघता बघता निम्मा संघ गारद केला.
ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लयॉनने भारताची टॉप ऑर्डर केएल राहुल (17), रोहित शर्मा (32), चेतेश्वर पुजारा (0) खिशात टाकली. यामुळे भारताची अवस्था 3 बाद 54 धावा अशी झाली. यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावण्याचा प्रयत्न केला. मात्र लयॉनने हा प्रयत्न देखील हाणून पाडला. त्याने अय्यरची 4 धावांवर शिकार करत भारताला चौथा धक्का दिला.
यानंतर लोकल बॉय विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी पाचव्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी रचत संघाला शतकी मजल मारून दिली. मात्र टॉड मर्फीने जडेजाला 26 धावांवर बाद करत भारताला मोठा धक्का दिला.
सर्व मदार विराट कोहलीवर असताना कूहमनने त्याला 44 धावांवर पायचीत पकडले. तिसऱ्या अंपायरचा हा निर्णय वादग्रस्त ठरला मात्र भारताचे नुकसान होऊन गेले.यानंतर लयॉनने पुन्हा आपला जवला दाखवत श्रीकार भरतला 6 धावांवर बाद केले आणि आपला पंजा पूर्ण केले. लयॉनने भारताविरूद्ध कसोटी क्रिकेटमध्ये विकेट्सचे शतक देखील पूर्ण केले.
ऑस्ट्रेलिया भारतावर निदान शंभरची आघाडी घेईल असे वाटत होते. मात्र भारताची खोलवर असलेली फलंदाजी पुन्हा एकदा कामाला आली. भारताची अवस्था 7 बाद 139 धावा अशी झाली असताना अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन या जोडीने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली.
अक्षरने डोक्यावर बसलेल्या कांगारूंच्या गोलंदाजांविरूद्ध दांडपट्टा सुरू करत झपाट्याने धावा केल्या. त्याला अश्विनने चांगली साथ दिली. अक्षरने कसोटी क्रिकेटमधील आपले दुसरे अर्धशतक पूर्ण करत भारताला 139 वरून थेट 250 पार पोहचवले. अश्विन - अक्षर जोडीने आठव्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी रचली.
अखेर पॅट कमिन्सने अश्विनला 37 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर मर्फीने अक्षर पटेललला 74 धावांवर बाद करत भारतला मोठा धक्का दिला. भारत पहिल्या डावात अजूनही 4 धावांनी पिछाडीवर होता. अखेर ऑस्ट्रेलियाने भारताचा पहिला डाव 262 धावात संपुष्टात आणत भारतावर पहिल्या डावात 1 धावेची आघाडी घेतली. कांगरूंकडून नॅथन लयॉनने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
हेही वाचा : ट्रेडिंग कुठल्याही प्रकारचे असो 'स्टाॅप लाॅस' हवाच
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.