पोर्ट ऑफ स्पेन : भारताने दुसऱ्या वनडे(West Indies Vs India) सामन्यात वेस्ट इंडीजचा 2 विकेट्सनी पराभव करत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. भारताकडून अक्षर पटेलने (Axar Patel) झुंजार अर्धशतकी खेळी करत वेस्ट इंडीजने ठेवलेले विजयासाठीचे 312 धावांचे आव्हान 49.4 षटकात पार केले. त्याने षटकार ठोकत भारताचा मालिका विजय साकारला. अक्षर पटेलने 35 चेंडूत नाबाद 64 धावांची खेळी केली. या विजयाबरोबरच भारताने वेस्ट इंडीज विरूद्धची सलग 12 वी मालिका जिंकून एकाच संघाविरूद्ध सर्वाधिकवेळा मालिका जिंकण्याचा विश्वविक्रम देखील केला. भारताने या यादीत पाकिस्तानला मागे टाकले. त्यांनी झिम्बावे विरूद्ध 11 मालिका जिंकल्या होत्या.
भारताने वेस्ट इंडीजच्या 312 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आश्वासक सुरूवात केली. भारताने 42 धावांची सलामी दिली. मात्र कर्णधार शिखर धवन 13 धावा करून बाद झाला. पाठोपाठ 43 धावांची आक्रमक खेळी करत शुभमन गिल देखील माघारी परतला.
दोन्ही सलामीवीर माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर ही मुंबईची जोडी क्रीज वर होती. मात्र सूर्यकुमारचा मायेर्सने 9 धावांवर त्रिफळा उडवत भारताला तिसरा धक्का दिला. यानंतर श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यांनी चौथ्या विकेटसाठी झुंजार 99 धावांची भागीदारी रचली.
मात्र ही जोडी अल्झारी जोसेफने फोडली. त्याने अय्यरला 63 धावांवर बाद केले. पाठोपाठ संजू सॅमसन देखील 54 धावा करून धावबाद झाला. यानंतर दीपक हुड्डा आणि अक्षर पटेलने अर्धशथकी भागीदारी रचत संघाला 250 चा टप्पा पार करून दिला. मात्र अकील हुसैनने दीपक हुड्डाला 33 धावांवर बाद केले.
दरम्यान, अक्षर पटेलने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने चौकार आणि षटकारांची बरसात करत सामना जवळ आणला. मात्र दुसऱ्या बाजूने शार्दुल ठाकूर 3 धावा करून बाद झाला. अक्षर पटेलने सामना 18 चेंडूत 19 धावा असा आणला. त्याच्या जोडीला असलेल्या आवेश खानने देखील 12 चेंडूत 10 धावा करत त्याला चागंली साथ दिली. मात्र विजयासाठी 7 चेंडूत 8 धावांची गरज असताना तो बाद झाला.
शेवटच्या षटकात विजयासाठी 8 धावा हव्या असताना मायेर्स गोलंदजी करण्यात आला. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर पटेल आणि सिराज यांनी पुढच्या दोन चेंडूवर दोन धावा केल्या. सामना 3 चेंडूत 6 धावा असा आला असताना अक्षर पटेलने मायेर्सला षटकार खेचत सामना स्टाईलमध्ये संपवला.
भारत आणि वेस्ट इंडीज (West Indies Vs India) यांच्यातील दुसरा वनडे सामन्यात (2nd ODI) वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय विंडीजच्या शाय होप आणि कायल मायेर्स या सलामी जोडीने सार्थ ठरवत 65 धावांची सलामी दिली.
मात्र त्यानंतर भारतीय फिरकीपटूंनी विंडीजला पाठोपाठ धक्के देत विंडीजची अवस्था 3 बाद 130 धावा अशी केली. मायेर्स 39 तर ब्रुक्स 35 आणि किंग शुन्यावर बाद झाला. दीपक हुड्डा, अक्षर पटेल आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. मात्र त्यानंतर शाय होप आणि कर्णधार निकोलस पूरन यांनी चौथ्या विकेटसाठी 117 धावांची शतकी भागीदारी रचत संघाला 250 चा टप्पा पार करून दिला. दरम्यान, शाय होपने आपले 13 वे वनडे शतक ठोकले. विशेष म्हणजे शाय होपने आपल्या शंभराव्या सामन्यात शतक ठोकले.
दरम्यान, शार्दुल ठाकूरने पूरनला 74 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. शार्दुल ठाकूरने रोव्हमन पॉवेलला 13 तर 49 व्या षटकात शाय होपला 115 धावांवर बाद केले. मात्र तोपर्यंत विंडीजने 300 धावांचा टप्पा पार केला होता. अखेर विंडीजने 50 षटकात 6 बाद 311 धावा केल्या.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.