नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2010 व्यवस्थापनेच्या आघाडीवर पूर्णपणे अपयशी ठरली असून, यामुळे देशाची पत गेल्याची टीका संसदीय समितीने आपल्या अहवालात केली आहे.
या स्पर्धेचे आयोजन करण्यात सरकारी यंत्रणेने अनेक चुका केल्यामुळेच स्पर्धेच्या व्यवस्थापनात अपयश आल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. संसदीय समितीचा अहवाल बुधवारी लोकसभेत मांडण्यात आला. तत्कालिक सरकारने परिस्थिती सुधारण्याचा अखेरपर्यंत प्रयत्न केल्यामुळे स्पर्धा यशस्वी पार पडली, अशी टिप्पणीदेखील अहवालात करण्यात आली आहे.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा सचिवांनी घेतलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले आहे; पण व्यवस्थापनाच्या आघाडीवर मोठे अपयश आल्याने जगभरात देशाची प्रतिष्ठा कमी झाल्याचा शेराही अहवालात मारण्यात आला आहे. एकूणच स्पर्धेच्या आयोजनात पारदर्शकतेचा अभाव असल्याचेही म्हणण्यात आले आहे.
|