Shubman Gill Advice To Dhruv Jurel : इंग्लंडविरूद्धच्या चौथ्या कसोटीत शुभमन गिलने दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी करत नाबाद 52 धावांची खेळी केली. त्याने ध्रुव जुरेलसोबत सहाव्या विकेटसाठी नाबाद 72 धावांची भागीदारी रचली. या भागीदारीमुळे अडचणीत सापडलेला भारत सावरला अन् चौथी कसोटी जिंकून मालिकेत 3-1 अशी आघाडी देखील घेतली.
शुभमन गिलने इंग्लंड टॉपवर असताना एकेरी अन् दुहेरी धावा घेत हळूहळू भागीदारी पुढे नेली. सामना जिंकून दिल्यानंतर या जोडीने आपल्या या जबरदस्त भागीदारीचे रहस्य उलगडले. सामना झाल्यावर शुभमन गिलने ध्रुव जुरेलला त्याने कोणता सल्ला दिला होता हे सांगितले.
शुबमन गिल म्हणाला, 'मी जुरेलला सांगितले की तू पहिल्या डावात अतिशय सुंदर फलंदाजी केलीस आणि त्याच मानसिकतेने फलंदाजी कर फक्त ऑफ स्पिनरचा सामना करताना फुटवर्कचा जास्त वापर कर. तो ज्या प्रकारे स्टपे आऊट होतो आणि खेळतो ते खूप सुंदर आहे.'
गिल भारताची अवस्था 5 बाद 120 धावा अशी झाल्यावर काय वाटत होतं हे सांगताना म्हणाला की, 'त्यांनी आमच्यावर दबाव वाढवला होता. मात्र आमच्या सलामीवीरांनी आम्हाला चांगली सुरूवात करून दिली होती. पाठोपाठ दोन विकेट्स पडल्याने दबाव तर नक्कीच येतो. मात्र जुरेल आला आणि त्याने सर्व दबाव दूर केला.'
'तुम्हाला परिस्थितीनुसार खेळणे गरजेचे असते. ते गोलंदाजी चांगली करत होते आणि चौकार मारण्याची संधी देत नव्हते. त्यामुळे आम्ही त्यांना निर्धाव षटक टाकण्याची संधी न देण्याचं ठरवलं आणि एकेरी धावा घेणं सुरू ठेवलं.'
खेळपट्टीबाबत बोलताना गिल म्हणाला, 'पहिल्या डावात चेंडू इतका टर्न होत नव्हता. त्यामुळे मी फुटवर्कचा फार वापर केला नाही. मात्र दुसऱ्या डावात मी फुटवर्कचा चांगला वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पायचित होण्याची शक्यता कमी झाली. आमच्याकडे कसोटीत फलंदाजी करण्याचा फार अनुभव नव्हता. त्यात आम्ही पहिल्या कसोटीनंतर केएल राहुलला गमावले. मात्र रोहित भाईने आम्हाला खंबीर पाठिंबा दिला. त्याने आमचा विश्वास वाढवला. त्याने आम्हाला तुमच्या पद्धतीने खेळण्याचे स्वतंत्र्य दिले.'
भारताचा हैदराबाद कसोटीत 28 धावांनी पराभव झाला होता. त्यानंतर मात्र भारताने विशाखपट्टणम कसोटीत 106 धावांनी विजय मिळवला. राजकोट कसोटी तर 434 धावांनी एतिहासिक विजय मिळवला. मात्र रांची कसोटीत इंग्लंडने भारताला चांगलंच अडचणीत आणलं होतं. आव्हानात्मक खेळपट्टीवरील सामन्यात भारताने नाणेफेक गमावली होती. मात्र तरी देखील भारताने 5 विकेट्सनी विजय मिळला. आता मालिकेतील पाचवा कसोटी सामना हा धरमशाला येथे होणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.