IPL सुरू होण्यापूर्वी भारतीय खेळाडू इंग्लंडच्या दौऱ्यावर कसोटी मालिका खेळत होते. या मालिकेदरम्यान भारताच्या टी२० विश्वचषक स्पर्धेसाठीच्या संघाची घोषणा करण्यात आली. या संघात अनुभवी सलामीवीर शिखर धवन आणि अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहल या दोघांना संधी नाकारण्यात आली. पण गेल्या एक-दीड वर्षात जो खेळाडू फारसा क्रिकेट खेळलेला नाही, अशा हार्दिक पांड्याला मात्र संघात स्थान देण्यात आले. हार्दिक पांड्या सध्या IPL मध्ये खेळत आहे. पण मुंबईच्या संघातून तो केवळ फलंदाजी करतो आहे. त्याला अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले असूनही तो गोलंदाजी करत नाहीये. अशा परिस्थितीत तो पूर्णपणे तंदुरूस्त आहे की नाही? जर तो पूर्णपणे तंदुरूस्त नसेल, तर त्याला संघात निवड समितीने घेतलंच कसं? असे काही खोचक सवाल टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने निवड समितीला केले.
"निवड समितीने निवडलेल्या संघात सर्वात मोठी अडचण आहे बॅटिंग लाईनअप मधील हार्दिक पांड्यासंदर्भातील.. हार्दिक पांड्याने गेल्या वर्षभरात फारसं क्रिकेट खेळलेलं नाही. माझ्यासाठी हार्दिक पांड्या म्हणजे केवळ निर्धारित षटकांच्या सामन्यातील खेळाडू आहे. त्याने गेल्या वर्षभरात जे मोजके सामने खेळले आहेत, त्यात त्याला फारशी चमक दाखवता आलेली नाही. अशा परिस्थितीत त्याला संघात घेतलंच कसं? तो गोलंदाजी करू शकत नसल्याचं दिसत असूनही त्याची निवड कशी काय करण्यात आली?", असा थेट सवाल गौतम गंभीरने केला.
"निवड समितीने हार्दिकच्या निवडीमागचं कारण नीट सांगितलं पाहिजे. हार्दिकला संघात घेतल आहे पण तो नक्की चार षटकांची गोलंदाजी करू शकणार आहे का? तो तेवढा तंदुरूस्त आहे का? कारण जर तो विश्वचषक स्पर्धेत गोलंदाजी करणार असेल तर त्याने आतापासूनच सुरूवात करायला हवी. प्रत्येक सामन्यात १,२ किंवा ४ षटकं टाकायची असतील तर त्याचा रोज सराव केला जायलाच हवा", असं गंभीर म्हणाला.
"हार्दिकचा संघात समावेश करण्यामागचे कारण म्हणजे अष्टपैलू खेळाडू. त्यामुळे जर विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्याने गोलंदाजी केली नाही तर कोणत्याही कर्णधाराला त्याला अंतिम ११मध्ये घेण्याआधी विचार करावा लागेल. जर हार्दिक पांड्या गोलंदाजी करण्यासाठी तंदुरूस्त नसेल तर तो भारताच्या सर्वोत्तम ११ जणांच्या संघात खेळण्यासाठी पात्र ठरूच शकत नाही", असं रोखठोक मत गौतम गंभीरने व्यक्त केलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.