नागपूर : मर्यादित षटकांच्या लढतीत आता मीच चौथ्या क्रमांकाचा फलंदाज असणार आहे. संघव्यवस्थापनाने आपणास हे सांगितले आहे, असे श्रेयस अय्यरने सांगितले. भारतीय संघाने यापूर्वी अनेकांचा चौथ्या क्रमांकासाठी प्रयोग केला आहे, पण ते विफल ठरले आहेत.
मी चौथ्या क्रमांकावर खेळणार असल्याचे संघव्यवस्थापनाने मला सांगितले आहे. त्यामुळे आता मला माझ्यावर पूर्ण विश्वास दाखवावा लागेल. गेल्या काही मालिकांत मी चौथ्या क्रमांकासाठीची दावेदारी सिद्ध केली. या क्रमांकासाठी खूपच चुरस होती, असे अय्यरने सांगितले. त्याने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-20 लढतीत 33 चेंडूत 62 धावांचा तडाखा दिला. त्याने विंडीज मालिकेत पाचव्या क्रमांकावर येत धावा केल्या होत्या.
कोहली आणि रोहित बाद झाल्यावर सामना फिनिश करू शकेल, अशा फलंदाजाची संघाला गरज आहे. चौथ्या क्रमांकावरील फलंदाजाचे हेच काम आहे. हेच करण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यात यश आले, असे त्याने सांगितले. विश्वकरंडक ट्वेंटी 20 स्पर्धेसाठी संघात खूपच चुरस आहे, याकडे लक्ष वेधल्यावर अय्यर म्हणाला, संघातील स्थानासाठी नक्कीच खूप स्पर्धा आहे, पण माझी स्पर्धा माझ्याशीच आहे, असे मी मानतो. माझी कोणाबरोबर तुलना व्हावी असे मला वाटत नाही. किंवा संघातील ही जागा रिक्त आहे, असेही मला ऐकलेले आवडत नाही, असेही तो म्हणाला.
अय्यर म्हणतो
- कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो.
- प्रतिकूल परिस्थितीतही चांगली खेळी करू शकतो हे दाखवले.
- सपोर्ट स्टाफने मलाच नव्हे तर सर्वांना मुक्तपणे खेळण्यास सांगितले आहे.
- चेंडू फटकावण्याची कोणतीही संधी सोडण्यास तयार नाही.
- एकाच षटकातील तीन षटकाराने आव्हान अवघड केले.
षटकात सहा षटकार खुणावत होते
सलग तीन षटकार मारल्यावर षटकात सहा षटकार मारण्याचा विक्रम खुणावत होता, असेही अय्यरने सांगितले. चौथ्या चेंडूवर षटकार मारण्यास उत्सुक होतो, पण गोलंदाजाने वाईड यॉर्कर टाकला, असे त्याने सांगितले.
|