नवी दिल्ली : भारतीय तिरंदाजी संघटनेस बडतर्फ करण्याचा निर्णय जागतिक तिरंदाजी संघटना कधीही घेण्याची चिन्हे आहेत. जागतिक संघटनेने भारतास संघटनेतील सत्तासंघर्ष 31 जुलैपर्यंत संपवण्यास सांगितले होते. आता ती मुदत संपल्यामुळे कधीही कारवाई होण्याची टांगती तलवार आहे.
भारतीय तिरंदाजीत केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा आणि बी.व्ही.पी. राव हे दोन समांतर संघटनांचे अध्यक्ष झाले आहेत. याबाबत न्यायालयाचा निर्णय या महिन्यात अपेक्षित आहे. त्यामुळे जागतिक संघटनेने कोणत्याही अंतिम निर्णयापूर्वी प्रतीक्षा करावी, ही भारतीय तिरंदाजी पदाधिकाऱ्यांची विनंती मान्य होण्याची शक्यता कमी आहे. जागतिक संघटनेच्या 14 जूनला झालेल्या विशेष कार्यकारिणी बैठकीत भारतास तातडीने उपाय करण्यास सांगितले होते.
संघटनेच्या बडतर्फीचा जागतिक युवा स्पर्धेतील भारताच्या सहभागावर कोणताही थेट परिणाम होणार नाही. या स्पर्धेसाठीच्या प्रवेशिका यापूर्वीच स्वीकारल्या आहेत. त्यामुळे या स्पर्धेच्या वेळी भारतीय राष्ट्रीय ध्वजाखालीच खेळतील; पण त्यानंतर स्वतंत्र प्रवेशिका स्वीकारल्या जातील. भारतीय तिरंदाजी संघटनेचा वाद न्यायालयात असल्यामुळे जागतिक संघटनेने ही मुभा दिली असल्याचे सांगितले जात आहे.
मुंडा आणि राव या समांतर संघटनेतील वाद संपवण्यासाठी जागतिक संघटनेने जूनमध्ये काझी रजीब उद्दीन अहमद चापोल यांना पाठवले होते; पण मुंडा गटाची निवडणूक दिल्लीत झाली; तर राव गटाची चंडीगडला. मुंडा गटाच्या निवडणुकीस वीस राज्य प्रतिनिधी उपस्थित होते; तर राव गटाच्या निवडणुकीस दहा.
|