पहिल्या कसोटी सामन्यावरील भारताची पकड घट्ट

पहिल्या कसोटी सामन्यावरील भारताची पकड घट्ट

अॅडलेड : चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने केलेल्या मोलाच्या भागीदारीच्या जोरावर भारताने दुसर्‍या डावात 307 धावांचा पल्ला गाठला. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 323 धावांचे आव्हान असताना त्यांचे दोन्ही सलामीवीर आणि उस्मान ख्वाजा स्वस्तात माघारी परतल्याने भारताच्या विजयाच्या संधी वाढल्या आहेत. 

चौथ्या दिवशीच्या खेळाची सुरुवात होताना नाबाद फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेवर लक्ष होते. रविवारचा सुट्टीचा दिवस असूनही अ‍ॅडलेड ओव्हल मैदानात फारच कमी प्रेक्षक हजर होते. दोघांनीही आपली जबाबदारी चोख पार पाडली. नॅथन लायनच्या अचूक मार्‍याला तोंड देताना पुजारा-रहाणने उत्तम तंत्र दाखवले. दुसरा नवा चेंडू घेण्याकरता टीम पेनने लायन - कमिन्स जोडीचा वापर केला. 80 षटके झाल्यावर लगेच दुसरा नवा चेंडू घेतला गेला. पुजारा आणि रहाणेने लायनला सावध खेळ करताना वेगवान गोलंदाजांवर नजर ठेवत धावा जमा केल्या. पुजाराचे अर्धशतक पहिले पूर्ण झाले. 

71 धावा करून पुजारा बाद झाल्यावर रोहित शर्माही पाठोपाठ तंबूत परतला. दडपणाचा बोजा सहन करत रहाणेने चांगली फलंदाजी केली. त्याच्या खेळीत शैलीदारपणा होता. रिषभ पंतने उपहारानंतर लायनला दणादण मोठे फटके मारले. 4 चौकार आणि एक लांब षटकार मारून 5 बाद 282 धावांवर चांगल्या अवस्थेत संघ असताना पंतने आततायी फटका मारताना लायनला विकेट बहाल केली. तोच क्षण गळती चालू व्हायला कारण ठरला. 

पुढे 21 धावांमध्ये 5 फलंदाज रांगेत बाद झाले. पंत, रहाणे, अश्विन, शमी सगळे हवेतून फटका मारण्याच्या नादात बाद झाले. रहाणेने सुंदर फलंदाजी करून 70 धावा केल्या पण बाद होताना त्याने रिव्हर्स स्वीपचा फटका का मारला हे समजले नाही. नॅथन लायनने कष्ट करताना 42 षटकांचा मारा करून 6 फलंदाजांना बाद केले. सुस्थितीत असलेला भारताचा डाव उपहारानंतर काही कळायच्या अर्ध्या तासात 307 धावांवर संपला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com