Ind vs Aus World Cup Final : खेळपट्टीने फसवले! द्रविड अन् सचिनचा सल्ला ऐकला नसता तर गांगुलीने वर्ल्ड कप जिंकला असता

Ind vs Aus World Cup Final : खेळपट्टीने फसवले! द्रविड अन् सचिनचा सल्ला ऐकला नसता तर गांगुलीने वर्ल्ड कप जिंकला असता

India Vs Australia ICC World Cup 2023 Final : सर्व चाहते आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा जेतेपदाचा सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पण सर्वांच्या नजरा खेळपट्टीवर खिळल्या आहेत.

भारतीय संघाच्या मागील काही सामन्यांपूर्वी खेळपट्टीबाबत बरीच चर्चा झाली होती, त्यात न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी आयसीसीनेही खेळपट्टीबाबतच्या वादावर आपले स्पष्टीकरण दिले होते. आणि आता फायनल सामन्यापुर्वी अहमदाबादच्या खेळपट्टीची जोरदार चर्चा आहे. पण हा किस्सा आहे वर्ल्ड कप 2003 फायनल भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्याचा, जेव्हा भारतीय खेळाडूंना खेळपट्टीने फसवले.

वर्ल्ड कप 2003 मध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड सारख्या चांगल्या संघांना पराभूत करत भारतीय संघ थाटात फायनलमध्ये पोहोचला होता. त्या सामन्याची तारीख होती 23 मार्च 2003. आणि सामना होता दक्षिण आफ्रिकामध्ये. सामन्याच्या दिवशी मैदानावर थोडा पाऊस पडला होता. खेळपट्टी थोडी ओली झाली असल्याने ती वाळवायला मैदानाच्या कर्मचाऱ्यांनी गरम वाफेचा मारा केला होता.

त्या कारणाने खेळपट्टीचा रंग काहीसा विचित्र दिसत होता. अंतिम सामना चालू होण्याअगोदर दोनही बाजूचे खेळाडू खेळपट्टीकडे बघून ती कशी खेळले याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करत होते. सौरभ गांगुलीने सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्यासोबत चर्चा करून टॉस जिंकला तर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यात सौरभ गांगुलीने टॉस जिंकला. आणि त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टी सुरुवातीला थोडी ओलसर होती, त्यामुळे चेंडू किंचित उसळी घेत होता.

भारताचा प्रमुख गोलंदाज जहीर खानसह भारताचे सर्वच गोलंदाज हे पहिल्यांदाच वर्ल्डकपची फायनल खेळत होते. अॅडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन या जोडीने फलंदाजीला आल्यावर कांगारूंच्या डावाला आक्रमक सुरुवात करून दिली. त्या दोघांचा आक्रमक अवतार पाहून भारतीय गोलंदाज बॅकफूटवर गेले. हेडन, गिलख्रिस्ट बाद झाल्यावर कर्णधार रिकी पाँटिंग फलंदाजीला आला. दिसायला विचित्र असणारी खेळपट्टी खेळायला मवाळ होती तिथेच भारतीय संघाचे गणित चुकले.

तो दिवस पाँटिंगचा होता. त्याने सर्व भारतीय गोलंदाजांवर चढवलेला हल्ला अफलातून होता. ८ षटकार मारून त्याने शतक केले. शतकानंतर त्याच्या फटक्यातील ताकद वाढली. समोरून डॅमीयन मार्टिनने सुंदर 88 धावा केल्या. पाँटिंग 140 धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाने 2 बाद 359 धावांचा डोंगर उभारला. भारतीय फलंदाज मोठ्या धावांचा पाठलाग करताना फार घाई करताना बाद झाले. ऑस्ट्रेलियाने भारताचा डाव 234 धावांत संपवून विश्वविजेतेपदावर नाव कोरले.

गरम वाफेचा वापर करून वाळवण्याच्या प्रकाराने खेळपट्टीचा बदललेला रंग भारतीय संघाला धोका देऊन गेला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला, ज्यावर पॉटिंगच्या भल्यामोठ्या शतकाने मीठ चोळले. द्रविड आणि सचिनचा सल्ला ऐकला नसता तर गांगुलीने वर्ल्ड कप जिंकला असता... हा प्रश्न आज चाहत्यांच्या मनात घोळत असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com