Rahul Dravid : आशियाई व विश्‍वकरंडकासाठी संघात प्रयोग कायम राहणार

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय लढतींमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजी क्रमवारीत बदल करण्यात आले.
Rahul Dravid
Rahul DravidSakal

ब्रिजटाऊन - वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय लढतींमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजी क्रमवारीत बदल करण्यात आले. दुसऱ्या लढतीत टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले; मात्र या लढतीतील निराशाजनक कामगिरीनंतरही मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी योजनेची पाठराखण केली.

लढतीनंतर राहुल द्रविड म्हणाले, ‘आशियाई करंडक व विश्‍वकरंडक या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धा नजीकच्या काळात होणार आहेत. या स्पर्धांच्या तयारीसाठी पुरेसा अवधी उपलब्ध नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत खेळाडूंची चाचपणी करण्यात येत आहे. यापुढेही प्रयोग कायम राहणार आहेत.’

‘भारतीय संघातील काही प्रमुख खेळाडू राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तंदुरुस्त होत आहेत. आशियाई करंडक व विश्‍वकरंडक या दोन्ही स्पर्धांसाठी यांच्यापैकी काही खेळाडू तंदुरुस्त होतील, अशी आशा आहे; पण आम्ही दुखापत झालेल्या खेळाडूंचे पुनरागमन होईल, यावर विश्‍वास ठेवू शकत नाही.

त्यासाठी पर्यायी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव मिळवून देणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या आम्ही तेच करीत आहोत. ऐनवेळी अशा खेळाडूंना थेट मोठ्या स्पर्धांमध्ये खेळवल्यास त्यांच्यावर दडपण येणार नाही,’ असे राहुल द्रविड स्पष्ट म्हणाले.

बाहेरच्या चर्चांवर लक्ष देत नाही

भारतीय फलंदाजी क्रमवारीत बदल करण्यात येत असल्यामुळे संघ व्यवस्थापनेच्या या योजनेवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. याबाबत राहुल द्रविड म्हणाले, ‘दुसऱ्या एकदिवसीय लढतीसाठी खेळपट्टी चांगली होती.

त्यामुळे आमच्या फलंदाजांच्या कामगिरीबाबत नाराज आहोत. २३० ते २४० धावा केल्या असत्या, तर विजयाची शक्यता अधिक होती; पण संघात गुणवत्तावान खेळाडू आहेत. त्यामुळे भारतीय संघातील प्रयोगावरून बाहेर सुरू असलेल्या चर्चांवर लक्ष देत नाही.’

सूर्यकुमारला आणखी संधी

टी-२० क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. याबाबत राहुल द्रविड म्हणाले, ‘सूर्यकुमारने स्थानिक स्पर्धांमध्ये जबरदस्त कामगिरी केलेली आहे.

आयपीएलमध्येही त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. आयपीएलही टी-२० स्पर्धा असते. या स्पर्धेतील अनुभवाच्या जोरावर त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्येही ठसा उमटवला; पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये अद्याप त्याला सूर गवसला नाही. सूर्यकुमारलाही ते माहीत आहे; पण त्याच्यामध्ये गुणवत्तेची कमी नाही. त्यामुळे त्याला आणखी संधी देण्यात येतील. या संधीचे सोने कसे करायचे, हे त्याच्या हातामध्ये असणार आहे.’

गिलच्या फॉर्मची चिंता नाही

सलामी फलंदाज शुभमन गिल याला पहिल्या दोन लढतींमध्ये अनुक्रमे सात व ३४ धावा करता आल्या. त्यामुळे गिलच्या फलंदाजी फॉर्मबद्दल चिंता वाटते का, असा प्रश्‍न करण्यात आल्यानंतर राहुल द्रविड म्हणाले, ‘गिल भारतासाठी तिन्ही प्रकारांमध्ये खेळतो. तो चांगली फलंदाजीही करीत आहे. येथील खेळपट्टी फलंदाजीसाठी तेवढी सोपी नव्हती.

तसेच प्रत्येक डावानंतर फलंदाजी फॉर्मबद्दल चिंता व्यक्त करणे योग्य नव्हे. आगामी लढतींमध्ये तो फॉर्ममध्ये येईल, अशी आशा बाळगतो.’ ‘इशान किशनने मात्र मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. यापुढेही युवा खेळाडूंना अधिकाधिक संधी देण्याचा प्रयत्न करू,’ असे सूतोवाच राहुल द्रविड यांनी या वेळी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com