इंदूर : भारतातच पाच कसोटी केंद्र असावीत, या विराट कोहलीच्या टिपण्णीस इंदूरवासीयांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कसोटी सुरू होण्यास 24 तास असतानाच 27 हजार क्षमतेच्या या स्टेडियमवरील 18 हजार तिकिटांची विक्री झाली आहे.
तीन वर्षांपूर्वीची येथील पहिली कसोटी हाऊसफुल होती. आता हेच यावेळीही घडण्याची चिन्हे आहेत. कसोटी सुरू होण्यापूर्वी दोन दिवस नऊ हजार सिझन तिकिटांची विक्री झाली आहे. कसोटीचे रोजचे किमान तिकीट दिडशे आणि जास्तीत जास्त चारशे आहे. याचवेळी सिझन तिकीट 315 पासून 1845 रुपयांपर्यंत आहे. त्याशिवाय विद्यार्थी तसेच दिव्यांगांना कमी दरात तिकिटे आहेत.
देशांतर्गत लढतीसाठीही दोन हजार चाहते येतात, कसोटीस चांगला प्रतिसाद असणारच, असे मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी सांगतात. स्टेडियम शहराच्या मध्यभागी आहे. शहराच्या कोणत्याही भागातून स्टेडियमला येण्यास जास्तीत जास्त अर्धा तास लागतो, याकडेही लक्ष वेधले जाते.
सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीला तिकिटांचा प्रतिसाद सांगत पाच स्टेडियमबाबत विचारणा करण्यात आली. ""इंदूरला चांगला प्रतिसाद लाभतो, पण हा अपवादच म्हणावा लागेल. परदेशी संघांना आपण जिथे खेळणार आहोत, तेथील सर्व माहिती असावी, त्याचबरोबर तिथे एक कसोटी संस्कृती तयारी व्हावी हा विचार होता,'' असे कोहलीने सांगितले. मी काही कोणत्या शहरावर टीका केली नव्हती किंवा तिथे सामने घेऊ नका, असेही म्हटले नव्हते. तिथे मर्यादित षटकांच्या लढती होऊ शकतात, असेही भारतीय कर्णधार म्हणाला.
|