चेन्नईतील चेपॉकच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पाहुण्यांचा खेळ बिघडवला. पहिल्या कसोटीतील 'विराट' पराभवाचा वचपा काढण्यासाठी पिच क्युरेटरकडून खेळपट्टीत करण्यात आलेला बदल भारतीय संघाच्या फायद्याचा ठरतोय हे निश्चित. पण याला खेळपट्टीला दोष देऊन चालणार नाही. पहिल्या दिवसापासूनच चेंडू कमालीचा वळताना दिसला. खेळपट्टीवरील छाटलेलं गवत, पाण्याचा अल्प वापर आणि रोलिंग न केल्यामुळे चेंडू पडल्यानंतर उडणारा धुरळा इंग्लिश फलंदाज गोत्यात येणार याचे संकेत देणारा होता.
विराटने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेत चौथ्या दिवशी फलंदाजी करण्याची वेळ येणार नाही याची काळजी घेतली. आघाडी कोलमडल्यानंतर रोहित आणि अजिंक्य रहाणे या मुंबईकरांनी संघाचा डाव सावरण्याचं धनुष्य यशस्वीपणे उचललं. रोहित थांबला की खेळपट्टी पाटा होते आणि प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांची वाट लागते, याची अनुभूती भारताच्या पहिल्या डावात आली. फिरकीसाठी अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर पहिल्या दिवशी टिम इंडियाने केवळ 6 विकेट गमावल्या. ही एक भारतीय संघाची जमेची बाजू ठरली.
दुसऱ्या दिवशी तब्बल 15 विकेट पडल्यावर खेळपट्टी खराब असल्याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. तिसऱ्या दिवशी 12 विकेट पडल्या. ही आकडेवारीमुळे निकाल चौथ्या दिवसापंर्यंत लांबला. अश्विन थांबला नसता तर कदाचित तिसऱ्याच दिवशी निकाल लागला असता आणि कसोटीच्या निकालानंतर खेळपट्टीचे वाभाडे निघले असते. तिसऱ्या दिवसाअखेर पडलेल्या 33 विकेट्समध्ये अश्विनच्या शतकाचा फार मोठा दिलासा टीम इंडियाला तर मिळालाच शिवाय चेन्नईच्या खेळपट्टीला गालबोट लागणार नाही, यासाठीही त्याची खेळी उपयुक्त ठरली. अश्विनला ज्या खेळपट्टीनं घडवलं तिच पांग फेडण्याच्या इराद्याने तो थांबला आणि शतकी खेळी केली असे म्हटले अतिशोक्ती ठरणार नाही.
आर अश्विनने चौथ्या दिवशी शतकी खेळी करुन खेळपट्टीकडे बोट दाखवणाऱ्यांना तोंडात बोट घालायला भाग पाडले. भल्या भल्यांना जमलं नाही ते अश्विननं करुन दाखवलं. शतकी खेळी साकारताना त्याने स्विपचा पुरेपूर वापर केला. वयाच्या 19 व्या वर्षी त्याने चेन्नईच्या मैदानात स्विप शॉट लगावले होते. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध जवळपास 12-13 वर्षांनंतर स्विप शॉटवर भर दिल्याचे अश्विननं शतकी खेळीनंतर सांगितलं होते. त्याच्या बहरादर खेळीत फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांचंही योगदान आहे. खुद्द अश्विनने यासंदर्भात माहिती दिली होती. त्यामुळेचं त्याच्या खेळीच कौतुक करावं तितक थोडच आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.