इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन नेहमीच भारतीय क्रिकेट टीम आणि खेळाडूंवर निशाणा साधत असतो. आयपीएलमधील आरसीबीचा प्रवास संपुष्टात आल्यानंतर त्याने आता विराटच्या कॅप्टन्सीवर भाष्य केले आहे. आयपीएलमध्ये विराटने आपल्या फ्रेंचायझी संघाला एकही ट्रॉफी जिंकून दिली नाही. ही गोष्ट कायम लक्षात राहिल. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 4 विकेट्सनी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासह त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. विराट कोहलीने कसोटीमध्ये नेतृत्व करताना खूप काही करुन दाखवलं आहे. पण आयपीएलमध्ये तो गोंधळलेल्या अवस्थेत दिसला, असे वॉनने म्हटले आहे.
टेस्ट आणि वनडे-टी-20 कॅप्टन्सीमध्ये फरक जाणवला
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वॉन म्हणाला की, विराट कोहली भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व उत्तमपद्धतीने करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा कसोटी दर्जा सुधारला. विराट वनडे आणि टी-20 मध्ये कॅप्टन्सी करतो त्यावेळी त्याच्यामध्ये कसोटी संघाच्या नेतृत्वावेळी जी धमक दिसते ती दिसत नाही. विराट कोहलीला ताफ्यात बॅटिंग -बॉलिंग दोन्ही क्षेत्रात चांगले खेळाडू होता. मागील काही वर्षांत आरसीबीचा संघ फलंदाजीत भक्कम दिसला. यावेळी गोलंदाजीत हर्षल पटेल आणि चहलने चमकदार कामगिरी केली. याचा फायदा कोहलीला करुन घेता आला नाही, असे वॉनने म्हटले आहे.
कर्णधार म्हणून विराट कोहलीची कामगिरी
विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे 140 सामन्यात नेतृत्व केले. यात आरसीबीने 66 सामने जिंकले तर 70 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. कोहलीच्या नेतृत्वाखाली 2016 मध्ये आरसीबीने फायनल गाठली होती. त्यावेळी सनरायझर्स हैदराबादने त्यांना दणका दिला होता. संघाचे नेतृत्व करताना विराट कोहलीने 139 डावात 4 हजार 871 धावा केल्या आहेत. यात 5 शतकांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कोहली आघाडीवर आहे. पण कॅप्टन्सीची छाप पाडण्यात तो अपयशी ठरला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.