नवी दिल्ली : इंग्लंडचे खेळाडू पूर्ण आयपीएलसाठी उपलब्ध असतील, असे आम्हाला सांगण्यात आले होते; परंतु विश्वकरंडक स्पर्धेच्या तयारीसाठी त्यांचे खेळाडू प्ले ऑफच्या अगोदर मायदेशी परतले हे दुर्दैवाचे आहे, अशी निराशा आयपीएलचे आयुक्त अरुण धुमल यांनी व्यक्त केली.
१ जूनपासून सुरू होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी इंग्लंडने जाहीर केलेला संघ तयारीसाठी पाकविरुद्ध मायदेशात ट्वेन्टी-२० मालिका खेळणार आहे, त्यासाठी जॉस बटलरसह त्यांचे वर्ल्डकप संघातील खेळाडू मायदेशी परतले आहेत.
या प्रकारामुळे आयपीएल आयुक्त नाराज झाले आणि त्यांनी दुर्दैवी अशा शब्दात आपले मत व्यक्त केले. या आयपीएलमध्ये आपले सर्व खेळाडू पूर्ण स्पर्धेपर्यंत उपलब्ध असतील, असे इंग्लंड क्रिकेट मंडळाने आम्हाला कळवले होते, असे ते म्हणाले.
इंग्लंड क्रिकेट मंडळाच्या प्रशासनातील व्यक्ती बदलल्या. अगोदरचे प्रशासन आणि आत्ताचे यांच्यामध्ये योग्य संवाद झाला नाही. नव्या प्रशासनातील व्यक्तींना पाकविरुद्धच्या मालिकेची माहिती नसावी आणि त्यांनी अचानक या मालिकेसाठी सर्वोत्तम संघ खेळायला हवा, अशी भूमिका घेतली असावी, असे धुमल यांनी सांगितले.
वास्तविक पाकविरुद्धची ही मालिका आयसीसीच्या २०२३ ते २०२७ हा नियोजित मालिकेचा (टीएफटी ः भविष्यातील मालिकांचा कार्यक्रम) भाग आहे. पाच वर्षांचा हा कार्यक्रम आयसीसीकडून ऑगस्ट २०२२ मध्येच जाहीर करण्यात आलेला आहे.
त्यानंतर म्हणजेच सप्टेंबर २०२२ मध्ये रिचर्ड थॉमसन यांनी इंग्लंड मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले. तसेच फेब्रुवारी २०२३ मध्ये रिचर्ड गौल्ड हे सीईओ झाले; परंतु प्रश्न जुन्या आणि नव्या प्रशासकांमधील संवादाचा येतो. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला.
विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघ निवड झाल्यावर लगेचच या खेळाडूंना पाकविरुद्धची मालिका खेळायला मायदेशी परतण्याचे आदेश नव्या प्रशासकांकडून देण्यात आला. मात्र, इंग्लंड संघ व्यवस्थापक रॉब की यांचे म्हणणे वेगळेच आहे. प्ले ऑफअगोदर सर्व खेळाडूंनी मायदेशी परतावे, असे कर्णधार जॉस बटलरनेच खेळाडूंना सांगितले असल्याचे रॉब की म्हणाले होते. बटलर मायदेशी परतल्यामुळे राजस्थान रॉयल्स संघाला मोठा फटका बसला.
प्ले ऑफसाठी बटलर आणि फिल साल्ट हे महत्त्वाचे खेळाडू आहेत. त्यांनी आयपीएल पूर्ण करावी, यासाठी बीसीसीआयने प्रयत्न केले. आम्ही इंग्लंड मंडळाशी चर्चा केली आहे. भविष्यात असे प्रकार घडू नये, यासाठी काळजी घ्यावी, असे आम्ही त्यांना सांगितले आहे. प्रशासनातील व्यक्तींमध्ये बदल झाला तरी काही निर्णय बदलायचे नसतात, असे धुमल म्हणाले.
परदेशी खेळाडूंनुसार प्रत्येक संघ आपली रचना तयार करत असतो आणि हे खेळाडू मध्यावरच परतल्यामुळे संघाचा समतोल बिघडतो. अशा खेळाडूंना दंड करावा, अशी मागणी सुनील गावसकर यांनी केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.