मुंबई : अग्री चोप्राचे द्विशतक, चिन्मय सुतारचे शतक तसेच तनुष कोटियनच्या भेदक गोलंदाजीमुळे मुंबईने सी. के. नायडू (23 वर्षांखालील) करंडक क्रिकेट स्पर्धेतील बंगालविरुद्धची लढत दोन दिवसांतच जिंकली. ठाण्याच्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात दोन तपांनंतर झालेला सामना मुंबईने एक डाव आणि 375 धावांनी जिंकला.
प्रथम फलंदाजी केलेल्या बंगालचा डाव पहिल्या दिवशी उपाहारापूर्वी 34.2 षटकांत 91 धावांत संपला होता; तर मुंबईने दुसऱ्या दिवशी चहापानानंतर बंगालचा दुसरा डाव 21.4 षटकांत 81 धावांत संपुष्टात होता. क्षेत्ररक्षण करताना जखमी झालेल्या सुदीप घारामी याने फलंदाजी केली नाही.
बंगालने मुंबईची 4 बाद 130 अशी अवस्था केली होती, पण अग्नी चोप्रा आणि चिन्मय सुतारने पाचव्या विकेटसाठी 343 धावांची भागीदारी केली. नवव्या क्रमांकावरील मिनाद मांजरेकरने आक्रमक 41 धावा करीत बंगालच्या जखमेवर मीठच चोळले. सुटलेल्या झेलांचा त्यांना फटका बसला. फलंदाजी करताना बंगालची प्रतिकाराची तयारीच नव्हती. त्यांच्या एकाही फलंदाजाने विशी पार केली नाही आणि नांगी टाकल्याने मुंबईला सात गुण मिळवण्यात प्रश्न पडले नाहीत.
संक्षिप्त धावफलक- बंगाल, पहिला डाव ः 91 आणि दुसरा डाव ः 21.4 षटकांत 81 (सौरव पॉल 10, काझी सैफी 18, अग्नीव पान 17, तनुष कोटियन 8-0-35-6) पराजित वि. मुंबई, पहिला डाव ः 117 षटकांत 547 (अमन खान 49, हार्दिक तामोरे 41, अग्नी चोप्रा 201- 247 चेंडूत 21 चौकार आणि सात षटकार, चिन्मय सुतार 142- 200 चेंडूत 11 चौकार आणि 5 षटकार, मिनाद मांजरेकर 41- 30 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकार, प्रशांत सोळंकी नाबाद 22- 32 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकार, संदीपन दास 19-4-71-3, मोहम्मद कैफ 17-3-63-2, प्रदीप्ता प्रामाणिक 35-2-163-4)
|