भारतीय संघाची आजपासून न्यूझीलंडविरूद्ध तीन सामन्यांची टी२० मालिका सुरू होणार आहे. १७, १९ आणि २१ असे तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी तीन सामने खेळण्यात येणार आहेत. आधी IPL आणि त्यानंतर टी२० विश्वचषक यामुळे सर्वच खेळाडू बायोबबलमध्ये आपल्या आप्तेष्टांपासून दूर होते. त्यातच आता न्यूझीलंडविरूद्ध मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे या मालिकेसाठी भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघांनी काही महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला असून संघाचा नवा टी२० कर्णधार रोहित शर्मा याने या निर्णयाबद्दल माहिती दिली. याच मुद्द्यावर चर्चा रंगलेली असताना पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने एक महत्त्वाचे विधान केले.
"भारतीय संघ डिसेंबर २०२०पासून सतत क्रिकेट खेळत आहे. टी२०, कसोटी आणि वन डे अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये आम्ही खेळतो आहोत. त्यामुळे या मालिकेसाठी आणि पुढील कसोटी मालिकेसाठी काही खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. खेळाडू म्हणजे मशिन नाहीत. त्यांनाही थकवा येतो. त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांना चांगली कामगिरी करत राहायची असेल, तर ठराविक अंतराने ब्रेक देणं आवश्यक असतं", असं स्पष्ट मत रोहितने मांडलं.
रोहितच्या या मताला अनेकांनी पाठिंबा दिला. पाकिस्तानची माजी कर्णधार सलमान बटदेखील यात दाखल झाला. त्याने आपल्या यूट्युब चॅनेलवरून मत मांडलं. "शारीरिक ताण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याची काळजी घेतली जायलाच हवी. रोहितने याबद्दल रोखठोक भूमिका मांडली. रोहित आणि विराटची हीच बिनधास्त शैली मला आवडते. जेव्हापासून धोनी संघाचा कर्णधार झाला तेव्हापासून ही पद्धत हळूहळू रुजू झाली. ते रोखठोकपणे मनात असेल ते बोलतात. ज्या प्रश्नांची उत्तर देण्याची गरज असते त्याला ते नक्कीच प्रतिसाद देतात. प्रत्येक खेळाडूला विश्रांतीची गरज असते ही सत्यपरिस्थिती आहे. कामगिरीत चढउतार सुरूच असतात, पण त्यासोबतच संघाच्या नेतृत्वाने आपल्या खेळाडूंची बाजूही मांडली पाहिजे. ही गोष्ट भारतीय क्रिकेटमध्ये धोनी, विराटने केली आणि रोहितदेखील ही परंपरा पुढे सुरू ठेवेल", अशी खात्री सलमान बटने व्यक्त केली.
नवे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही याबद्दल पहिल्यावहिल्या पत्रकार परिषदेत आपले मत व्यक्त केले. "सततच्या सामन्यांचा ताण आणि त्यातून मार्ग काढणे आता क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाचे आहे. फुटबॉलमध्येही तसेच घडत आहे. शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती सर्वाधिक महत्त्वाची असताना वर्कलोडचा समतोल साधणे अनिवार्य आहे. खेळाडू म्हणजे मशिन नाही हे रोहितचं म्हणणं अगदी खरं आहे. भविष्यातील सर्व आव्हानांसाठी आपले खेळाडू ताजेतवाने आणि तंदुरुस्त राहणे आवश्यक आहे आणि प्रत्येक मालिका खेळल्यानंतर आम्ही सर्वांचे अवलोकन करणार आहोत", असे मत राहुल द्रविडने व्यक्त केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.