IND vs NZ : भारतीय संघ उद्यापासून न्यूझीलंड विरूद्ध क्रिकेट मालिका खेळणार आहे. न्यूझीलंडचा संघ १७ नोव्हेंबरपासून ते ७ डिसेंबरपर्यंत भारत दौऱ्यावर असणार आहे. या कालावधीत भारत-न्यूझीलंड यांच्यात ३ टी२० आणि २ कसोटी सामने खेळले जाणार आहेत. या मालिकेआधी भारताचे नव्याने नियुक्त झालेले कोच राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मावळता कर्णधार विराट कोहली याची संघातील भूमिका आता काय असेल यावर रोहितने उत्तर दिले.
"विराट कोहली गेल्या काही वर्षांपासून संघासाठी जे करत आहेत तेच तो पुढे करत राहिल. संघासाठी तो खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. जेव्हा तो खेळतो तेव्हा तो स्वत:ची एक वेगळी छाप सोडतो. प्रत्येक सामन्यासाठी भूमिका वेगळी असते. प्रथम फलंदाजी करताना फलंदाज वेगळ्या प्रकारे खेळतो, तर आव्हानाचा पाठलाग करताना रणनिती बदलावी लागते. अशा वेळी संघाची गरज ओळखून खेळाडूंमध्ये बदल केले जातील आणि साऱ्यांनाच या गोष्टी मान्य असतील याची मला खात्री आहे. या मालिकेत विराटला विश्रांती देण्यात आली असली तरी तो जेव्हा संघात परत येईल तेव्हा त्याच्या फलंदाजीचा संघाला फायदाच होईल", अशा शब्दात रोहितने विराटच्या भूमिकेबद्दल सांगितलं.
"विराट खूपच चांगला फलंदाज आहे. त्याच्या गाठीशी प्रचंड अनुभव आहे. तो फलंदाज म्हणूनही अत्यंत गुणवंत आहे. प्रत्येक सामन्यासाठी प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी असते. त्यानुसार तो खेळाडू मैदानात उतरतो. विराटचा अनुभव पाहता आणि त्याच्या फलंदाजीतील स्मार्टनेस पाहता तो ज्यावेळी मैदानात उतरेल त्यावेळी त्याचा भारतीय संघालाच फायदा होईल", असं रोहित शर्मा म्हणाला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.