South Africa vs India 2nd Test Playing 11 : नववर्षाची सुरुवात चांगली करायची असेल तर भारतीय क्रिकेट संघाला केपटाऊन कसोटीत कंबर कसावीच लागेल. यजमान दक्षिण आफ्रिकन संघाशी दोन हात करायची इच्छा तेव्हाच सत्यात उतरेल जेव्हा भारतीय संघ पहिल्या डावात दणकट कामगिरी करायची तयारी दाखवेल. दक्षिण आफ्रिकन कप्तान डीन एल्गरचा हा शेवटचा कसोटी सामना असल्याने यजमान संघ चांगल्या खेळासाठी अजून प्रेरित झाला आहे.
संघ कोणताही असो परदेश दौऱ्यावर गेला असता पहिल्या कसोटी सामन्यात सपाटून मार खाणे आजकालच्या क्रिकेटमध्ये नेहमीचे झाले आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमुळे प्रत्येक संघ मायदेशात खेळताना आपल्या संघाला मदत होणारी खेळपट्टी तयार करायचा प्रयत्न करते. बऱ्याच लोकांना वाटते, की भारतीय संघ परदेशात अगदी सामान्य खेळ करतो. प्रत्यक्षात गेल्या काही वर्षांचा इतिहास तपासता असे दिसून येते, की बाकीच्या संघांच्या तुलनेत त्यातल्या त्यात भारतीय संघच परदेशात जाऊन इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघांना टक्कर देण्याची तयार दाखवत आला आहे.
आता प्रश्न इतकाच आहे, की रोहित शर्माच्या संघात मालिकेत एक हजार चेंडू खेळणारा चेतेश्वर पुजारा नाहीय तसेच कठीण खेळपट्टीवर भन्नाट फलंदाजी करणारा अजिंक्य रहाणेही नाहीय. परिणामी अनुभवी विराट कोहली आणि रोहित शर्माबरोबर चांगली कामगिरी करून दाखवायची जबाबदारी यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिलवर आली आहे.
तसे बघायला गेले तर दक्षिण आफ्रिकन संघातही अनुभव नसलेल्या खेळाडूंचा भरणा आहे. फरक इतकाच आहे, की तो संघ मायदेशात खेळतो आहे. आम्ही सविस्तर चर्चा केली आहे. आम्हाला पहिली कसोटी जिंकण्याचा आनंद आहे, समाधान नाही. कसेही करून चांगला खेळ करून मालिका २-० फरकाने जिंकायची इच्छा सगळ्या खेळाडूंची आहे. हा माझा अखेरचा कसोटी सामना असणार आहे. तरीही संघात कोणाही एका खेळाडूच्या कामगिरीची चर्चा होत नसते. सगळ्यांना फक्त संघाचे ध्येय खुणावत आहे ते म्हणजे कसोटी सामना जिंकणे, डीन एल्गरने स्पष्टपणे सामन्याबद्दलचे विचार मांडले.
रोहित शर्माने पत्रकार परिषदेत भारतीय संघ पुनरागमन करायची तयारी ठेवतो अशी ग्वाही दिली. हे सत्य आहे की पहिल्या डावात चांगला खेळ झाला नाही, तर मग सामन्यात पुनरागमन करणे कठीण होते. गेल्या सामन्यात आम्ही भरपूर मोठी आघाडी समोरच्या संघाला घेऊ दिली तिथेच तोल गेला. पहिल्या डावात समोरच्या संघाच्या धावसंख्येच्या जवळ जाणारा खेळ करता यायलाच हवा. होय दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्ट्या फलंदाजांची परीक्षा बघतात. न्यूलँडसची खेळपट्टी त्याला अपवाद नसेल. केपटाऊनचे वातावरण थोडे गरम आहे इतकेच. आम्ही अजून अंतिम ११ जणांची निवड पक्की केली नाहीय. प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीत कसोटीत चांगली कामगिरी करायचे कौशल्य आहे असे मला अजूनही वाटते.
पदार्पण करताना थोडे दडपण येते ज्याचा परिणाम त्याच्या गोलंदाजीवर झाला असे मला वाटते. मी शेवटी म्हणेन, की न्यूलँडस् मैदानावर होणारा कसोटी सामना भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. गेल्या सामन्यात केलेल्या चुका सुधारून आम्हाला जोरदार खेळ करायचा आहे. त्यासाठी डीन एल्गरला लवकर बाद करता यायला हवे. त्याचा हा अखेरचा कसोटी सामना असला तरी त्याला फलंदाज म्हणून त्रास देणे, बाद करणे आमचे उद्दिष्ट आहे, रोहित शर्मा म्हणाला.
शार्दुलला वगळणार?
पहिल्या कसोटीच्या तुलनेत न्यूलँडस् मैदानाच्या खेळपट्टीवर गवत कमी आहे तसेच हवाही चांगली गरम आहे. तरीही दक्षिण आफ्रिकन गोलंदाज भारतीय फलंदाजांना त्रास द्यायला टपून बसले आहेत. भारतीय संघ दुसऱ्या कसोटीत शार्दुल ठाकूरला वगळून पाच प्रमुख गोलंदाजांसह मैदानात उतरायची शक्यता नाकारता येत नाही, ज्यात रवींद्र जडेजाचा समावेश नक्की आहे. अंतिम ११ जणांच्या संघात अजून एका वेगवान गोलंदाजाला संधी दिली जाते का जडेजा-अश्विनची जोडी एकत्र खेळते हे बघायचे आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.