IND vs ENG Tests: भारतीय संघ इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी गेला होता. पण चौथ्या सामन्यानंतर कोरोनाच्या भीतीपोटी शेवटचा सामना स्थगित करावा लागला. हा सामना पुन्हा केव्हा खेळला जाईल की त्याऐवजी काही वेगळी योजना केली जाईल याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. या मालिकेतील ३ सामन्यांनंतर मालिका १-१ अशी बरोबरीत होतील. पण चौथा सामना भारताने जिंकला. त्यात विशेष आकर्षक ठरले ते शार्दूल ठाकूरची फलंदाजी... त्याने दोन्ही डावांमध्ये अर्धशतके ठोकत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. शार्दूलने आपली फलंदाजी कशी सुधारली याचं उत्तर त्याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिलं.
"मी जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात जातो त्यावेळी मी जास्त विचार करत नाही. मी शांतपणे आलेला चेंडू खेळतो. मी शाळेत असताना माझे प्रशिक्षक दिनेश लाड सर मला नेहमी सांगायचे की जितका जास्त विचार करशील तितका गोंधळात पडशील. त्यामुळे चेंडू कसा येतो त्याप्रमाणे सरळ खेळत राहा. त्यामुळे गेल्या पाच वर्षात मी माझ्या फलंदाजी सहजता आणण्याचा प्रयत्न करतोय. एखादा फटका खेळताना शरीराची रचना कशी असावी याकडे मी लक्ष देतोय. एकदा सरळ बॅटने चेंडू खेळून सेट झालं की नंतर आडव्या बॅटने फटकेबाजी करणं सोपं जातं", असं शार्दूलने सांगितलं.
"मला माझ्यावर विश्वास होता की मी फलंदाजी करू शकतो. फक्त योग्य वेळी मला मैदानात उतरून ते इतरांना दाखवून द्यायचं होतं. कारण पिचवर तुम्ही काय करता हे महत्त्वाचं असतं. मैदानात कोणत्या ठिकाणी धावा करता येतील आणि कोणत्या जागी धावा करता येणार नाहीत, त्याचा मी आधीच अभ्यास करतो. ब्रिसबेनला माझ्या अर्धशतकानंतर माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. माझा आत्मविश्वास तर वाढलाच, पण आता मला नेट प्रॅक्टिसमध्येही नियमितपणे फलंदाजीचा सराव करायला दिला जातो. याचा अर्थ संघातील इतरांनाही माझ्या फलंदाजीवर विश्वास आहे", असं सकारात्मक मत शार्दूलने व्यक्त केलं.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.