
जोहान्सबर्ग : कर्णधार सूर्यकुमार यादवचे झंझावाती विक्रमी शतक (१०० धावा), यशस्वी जयस्वालच्या महत्त्वपूर्ण ६० धावा आणि रवींद्र जडेजा (२/२५), कुलदीप यादव (५-१७) यांच्यासह इतर गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने येथे झालेल्या अखेरच्या टी-२० लढतीत यजमान दक्षिण आफ्रिकेच्या संघावर १०६ धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
भारताकडून दक्षिण आफ्रिकन संघासमोर २०२ धावांचे आव्हान उभे ठाकले होते. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकन संघातील फलंदाजांचा निभाव लागला नाही. मुकेशकुमारने मॅथ्यू ब्रिटझ्केला चार धावांवर बाद केले,
त्यानंतर रिझा हेंड्रिक्स आठ धावांवर धावचीत झाला. कर्णधार एडन मार्करम व हेनरिक क्लासेन ही जोडी डाव सावरणार असे वाटत असतानाच अर्शदीप सिंगने क्लासेनला (५ धावा) व रवींद्र जडेजाने मार्करमला (२५ धावा) तंबूत पाठवत भारतासाठी मोलाची कामगिरी बजावली.
दक्षिण आफ्रिकन संघाची अवस्था ४ बाद ४२ धावा अशी झाली. त्यानंतर डेव्हिड मिलर याने एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण कुलदीप यादव भारतासाठी धावून आला. त्याने मिलर (३५ धावा), डोनोवन फेरेरा (१२ धावा),
केशव महाराज (१ धाव) व नांद्रे बर्गर (१ धाव), लिझाड विल्यम्स (०) यांना बाद करीत भारताचा विजय निश्चित केला. कुलदीपने १७ धावा देत निम्मा संघ गारद केला. दक्षिण आफ्रिकेचा डाव ९५ धावांत गारद झाला.
त्याआधी दक्षिण आफ्रिकन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वाल व शुभमन गिल या सलामीच्या जोडीने २९ धावांची भागीदारी करताना आश्वासक सुरुवात करून दिली; मात्र केशव महाराजच्या एकाच षटकात भारताला दोन धक्के बसले. सुरुवातीला गिल आठ धावांवर, त्यानंतर तिलक वर्मा शून्यावर बाद झाला.
यशस्वी व सूर्यकुमार या जोडीने भारतासाठी किल्ला लढविला. दोघांनी ११२ धावांची भागीदारी करताना भारताला संकटातून बाहेर काढले. ही जोडी खेळपट्टीवर उभी राहून धावा करणार असे वाटत असतानाच तबरेझ शम्सीच्या गोलंदाजीवर यशस्वी ६० धावांवर रिझा हेंड्रिक्सकरवी झेलबाद झाला. यशस्वीने ६० धावांची खेळी ६ चौकार व ३ षटकारांनी सजवली.
यशस्वी बाद झाल्यानंतर सूर्यकुमारने स्वबळावर भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली. त्याने ७ चौकार व ८ षटकारांसह शतकी खेळी करताना दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. लिझाड विल्यम्सच्या गोलंदाजीवर तो बाद झाला.
रिंकू सिंग (१४ धावा), जितेश शर्मा (४ धावा), रवींद्र जडेजा (४ धावा) यांना मोठी खेळी करता आली नाही. भारताने अखेरच्या सहा षटकांत ६० धावा काढल्या. दक्षिण आफ्रिकेकडून विल्यम्स व महाराज यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.
भारत २० षटकांत ७ बाद २०१ धावा (यशस्वी जयस्वाल ६०, सूर्यकुमार यादव १००- ५६ चेंडू, ७ चौकार, ८ षटकार, केशव महाराज २/२६, लिझाड विल्यम्स २/४६) विजयी वि. दक्षिण आफ्रिका १३.५ षटकांत सर्व बाद ९५ धावा (एडन मार्करम २५, डेव्हिड मिलर ३५, कुलदीप यादव ५/१७, रवींद्र जडेजा २/२५).
सूर्यकुमार यादवने गुरुवारी टी-२० मध्ये विक्रमी शतकी खेळी साकारली. हे त्याचे चौथे शतक ठरले. ग्लेन मॅक्सवेल व रोहित शर्मा या दोघांनाच टी-२० प्रकारात चार शतके झळकावता आली होती. आता सर्वाधिक शतके झळकाविण्याच्या यादीत सूर्यकुमारचाही समावेश झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.