विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला उद्यापासून सुरवात होत आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघातील अंतिम खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये रोहित शर्माला अपेक्षेप्रमाणे सलामीला संधी देण्यात आली आहे. रोहित शर्मावर सलामीला चांगली कामगिरी करण्याचे प्रचंड दडपण असणार अशी चर्चा होत आहे. मात्र, भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याला एवढ्यातच स्वत:ला सिद्ध करण्याची काहीच घाई नसल्याचे सांगितले आहे.
''रोहितला जर एकदिवसीय क्रिकेटसारखी आक्रमकता कसोटीत आणता आली तर तो आणि संपूर्ण संघ खूप खूश होईल. त्याच्या या आक्रमकतेचा संघाला खूप फायदा होईल. मात्र, आम्ही त्याच्यावर आक्रमक खेळ करण्याचे दडपण आणणार नाही. जर संघातील तीन फलंदाज बाद झाले आहेत आणि रोहित मैदानावर आहे तर त्याला मोठे फटके मारण्याचा विचार करता योणार नाही आणि याची त्याला चांगलीच कल्पना आहे. तो अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे आणि तो नक्कीच सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी करेल याची मला खात्री आहे,'' अशा शब्दांत कोहलीने रोहितला पाठींबा दिला आहे.
दरम्यान कोहलीने पंत अंतिम संघात नसल्याची घोषणाही केली आहे. त्याच्याजागी वृद्धिमान साहाचे पुनरागमन झाले आहे. पहिल्या सामन्यापूर्वी विराट कोहलीने साहाच यष्टीरक्षक म्हणून अंतिम संघात खेळणार असल्याचे स्पष्ट केले.
साहाने 2010मध्ये कसोटी पदार्पण केले आहे. मात्र, धोनीच्या कसोटी निवृत्तीनंतर त्याला संघात स्थान मिळाले. त्याने 32 कसोटी सामन्यांच्या 46 डावांमध्ये 1164 धावा केल्या आहेत. यामध्ये पाच अर्धशतकांचा समावेश आहे.
पहिली लढत : 2 ते 6 ऑक्टोबर - विशाखापट्टणम
दुसरी लढत : 10 ते 14 ऑक्टोबर - पुणे
तिसरी लढत : 19 ते 23 ऑक्टोबर - रांची
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.