मुंबई : ऑलिंपिक पात्रता नसलेल्या पण त्या स्पर्धेसाठी आपली चाचपणी करण्याची चांगली संधी भारतीय बॉक्सरना जागतिक स्पर्धेद्वारे मिळणार आहे. अर्थातच या स्पर्धा इतिहासातील पहिली अंतिम फेरीही भारतीय बॉक्सरना खुणावत असेल.
भारतीय पुरुष बॉक्सर विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी होत असले तरी जागतिक स्पर्धेतील आत्तापर्यंत एकत्रित कामगिरी चार ब्रॉंझ एवढीच आहे. विजेंदर सिंग (2009), विकास क्रिष्णन (2011), शिवा थापा (2015) आणि गौरव बिधुरी (2017) यांनी हे यश मिळवले आहे. आता या स्पर्धेद्वारे ऑलिंपिक पात्रता लाभणार नाही, पण स्पर्धेतील पदक विजेते ऑलिंपिक पात्रता स्पर्धेस थेट पात्र ठरतील असे जाहीर झाले आहे. त्यामुळे भारतीयांना कामगिरीसाठी चांगली प्रेरणा लाभेल.
रशियात सोमवारपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत टोकियो ऑलिंपिकप्रमाणे आठ गटातच स्पर्धा होणार आहे. ऑलिंपिक पात्रतेसाठी जागतिक महासंघाने हा निर्णय घेतला होता, पण आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने त्यांचा हा दर्जा काढून घेतला आहे. अर्थात त्यानंतरही या स्पर्धेत 87 देशांतील 450 बॉक्सरचा सहभाग आहे. ते 12 दिवसांत एकंदर चारशे लढती खेळतील.
भारताच्या सर्वाधिक आशा अमित फंगल याच्यावर आहेत. तो 52 किलो गटातील आशियाई तसेच आशियाई क्रीडा स्पर्धा विजेता आहे. दोन वर्षांपूर्वी त्याचे जागतिक पदक थोडक्यात हुकले होते. केवळ अमितच नव्हे, तर भारताच्या अनेक बॉक्सरनी गेल्या काही महिन्यांत चांगली कामगिरी केली आहे. याकडे भारतीय बॉक्सिंगचे हाय परफॉर्मन्स संचालक सॅंतिएगो निएवा यांनी लक्ष्य वेधले. अर्थातच त्यांचा रोख कविंदर बिश्त (57 किलो) आणि अनुभवी सतीश कुमार (91 किलोपेक्षा जास्त) यांच्याकडे होता.
कविंदरने आशियाई स्पर्धेत जगज्जेत्यास हरवले होते, तर सतीशचा अनुभव मोलाचा ठरेल असे मानले जात आहे. राष्ट्रकुल क्रीडा उपविजेत्या मनीष कौशिकने (63 किलो) निवड चाचणीत शिवा थापाला हरवून आशा निर्माण केल्या आहेत. आशियाई उपविजेत्या आशीष कुमारला (75 किलो) चांगला सूर गवसत आहे. स्पर्धेपूर्वीच्या दीर्घ सरावाचा भारतीयांना चांगला फायदा होईल असे मानले जात आहे.
जागतिक स्पर्धेतील आव्हान कधीच सोपे नसते. यापूर्वीपेक्षा सरस कामगिरीचे लक्ष्य आहे. या स्पर्धेद्वारे ऑलिंपिक पात्रतेच्या दृष्टीने किती तयारी झाली आहे याचाही अंदाज येईल.
- सॅंतिएगो निएवा, भारतीय बॉक्सिंगचे हाय परफॉर्मन्स संचालक
|