कराची : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यावरून पाक क्रिकेट मंडळाने आता राजकारण सुरू केले आहे. भारतात होणाऱ्या या विश्वकरंडक स्पर्धेत आमचा सहभाग सरकारच्या मान्यतेवर अवलंबून असेल, असे सांगून पाक मंडळाचे कार्याध्यक्ष नजम सेठी यांनी बीसीसीआयसह आयसीसीचीही कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेचे वेळापत्रक जवळपास निश्चित आहे. प्रत्येक मंडळाकडे ते मंजुरीसाठी पाठवण्यातही आल्याचे वृत्त आहे; पण नेमक्या याच वेळी पाक मंडळाकडून त्यात खडा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.
ही लढाई मुळात आशिया करंडक स्पर्धेवरून सुरू झाली होती. पाकिस्तानचे हायब्रीड मॉडेलला बीसीसीआयने विश्वकरंडक स्पर्धेतील भारत-पाक साखळी लढत अहमदाबादला खेळण्याच्या तत्त्वतः मान्यतेवरून पसंती दिली होती; पण मुख्य यजमान असूनही केवळ चार सामने आपल्या देशात होणे, हे त्यांना मान्य नसावे. परिणामी आता विश्वकरंडक स्पर्धेवरून कोंडी करण्याचा डाव त्यांनी सुरू केला आहे.
एकमेकांच्या देशात खेळायचे की नाही, हा निर्णय पीसीबी किंवा बीसीसीआय घेऊ शकत नाही. हा निर्णय संबंधित सरकारचा असतो. त्यामुळे भारतात होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळायचे की नाही, हे आमचे सरकार ठरवेल. त्यामुळे आम्ही अहमदाबादला खेळणार की नाही, हा प्रश्न उद्भवत नाही, असे सेठी यांनी सांगितले.
आशिया करंडक स्पर्धेचे मूळ यजमान पाकिस्तान होते; परंतु कोणत्याही परिस्थितीत आमचा संघ पाकमध्ये खेळणार नाही, अशी ठाम भूमिका बीसीसीआयने घेतल्यानंतर हायब्रीड मॉडेलचा प्रस्ताव पाक मंडळाला तयार करावा लागला होता. बीसीसीआयने सुरुवातीला या मॉडेललाही नकार दिला होता; परंतु विश्वकरंडक स्पर्धत १५ ऑक्टोबरची भारत-पाक प्रस्तावित लढत अहमदाबादला खेळण्यासाठी हे मॉडेल स्वीकारले होते.
आशिया कप आणि त्यानंतर होणारी विश्वकरंडक स्पर्धा सुरळीत पार पाडावी, यासाठी आयसीसीचे सीईओ जॉफ अल्ड्रिच आणि कार्याध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी कराचीत जाऊन सेठी यांची भेट घेतली होती. भारतात होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्यावरून आमची कोणती आडकाठी नसेल; मात्र आशिया करंडक स्पर्धेचे चार सामने तरी पाकमध्ये व्हायला हवेत, असे आश्वासन सेठी यांनी अल्ड्रिच आणि बार्कले यांना दिले होते. त्यामुळे आशिया करंडक स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क पाककडे कायम रहाणार आहेत.
आमच्या संघाच्या सुरक्षावरून आमच्या सरकारने परवानगी दिली, तर आम्ही भारतात खेळू; अन्यथा आम्ही खेळणार नाही. आणि सरकारने परवानगी दिली तरी आम्ही ठिकाणे पाहू आणि तेथे खेळायचे की नाही हे ठरवू; परंतु त्यासाठी अगोदर सरकारने परवानगी देणे महत्त्वाचे आहे, असेही सेठी म्हणतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.