नातीगोती : आपल्या कुटुंबाला द्या सर्वोच्च प्राधान्य

जे लोक केवळ एकत्रच राहात नाहीत, तर एकमेकांच्या मूलभूत गरजा भागवितात आणि भावनिक पाठिंबा देतात, त्यावर कुटुंबव्यवस्था अवलंबून असते.
Family Relations
Family RelationsSakal

- कीर्ती नागपुरे

माझ्या मते, जे लोक केवळ एकत्रच राहात नाहीत, तर एकमेकांच्या मूलभूत गरजा भागवितात आणि भावनिक पाठिंबा देतात, त्यावर कुटुंबव्यवस्था अवलंबून असते. कुटुंब टिकून राहण्यासाठी घरात वडीलधाऱ्या व्यक्तींचं असणं आवश्यक आहे. ही मूल्यं म्हणजे घर चालवण्याचं पुस्तकच असतं. ती मूल्यं अबाधित राहिली, तर कुटुंबात क्वचितच काहीतरी चुकीचं घडेल.

माझ्या घरातील प्रत्येकाशी मी भावनिकदृष्ट्या जवळचीच आहे; पण माझ्या बहिणीबरोबरचं माझं जे नातं आहे, ती जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. मी आज जी काही आहे, ती केवळ माझ्या बहिणीमुळेच आहे. मी तिच्याकडून अनेक गोष्टी शिकत गेले. ती आमचं कुटुंब आणि तिच्या कामाशी एकनिष्ठ आहे. तिच्याभोवती नेहमीच एक आशावादी वलय असतं, असं मला वाटतं.

तिचं लग्न ठरलं तेव्हा आनंदही झाला; मात्र लग्नानंतर ती आमच्यात राहणार नाही, या गोष्टीमुळे माझा भाऊ आणि मी दोघंही प्रचंड भावनिक झालो. आमच्या कुटुंबाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे आहे, की आम्ही सर्वजण कोणत्याही विषयावर एकमेकांच्या मतांना खूप महत्त्व देतो. अगदी किरकोळ निर्णय जरी घ्यायचा असेल, तरी तो सर्वांशी बोलून आणि सर्वानुमते घेतला जातो. आम्ही सर्वजण एकमेकांना पाठिंबा देतो आणि दुसऱ्याच्या दृष्टिकोनाला महत्त्व देतो.

मी सध्या ‘झी टीव्ही’वर ‘प्यार का पहला नाम- राधा मोहन’ या मालिकेत अभिनय करत आहे. चित्रीकरणामुळे मी व्यग्र असते. मात्र, मी जेव्हा माझ्या आई-वडिलांना भेटण्यासाठी पुण्याला जाते, तेव्हा आमचे सर्व नातेवाईक आमच्या घरी गेट टुगेदरसाठी एकत्र जमतात. माझी सर्व चुलत, आते भावंडं आणि आत्या-काकी वगैरे एकत्र जेवायला जातो किंवा कुठेतरी बाहेर जातो.

मला एक चार वर्षांचा भाचाही आहे आणि त्याच्याबरोबर खेळणं हा माझा घरी वेळ व्यतीत करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. रात्रीच्या जेवणानंतरही माझे आई-वडील, बहीण, भाऊ आणि मी वेळेचं भान सोडून एकमेकांशी गप्पा मारीत बसतो. आम्ही एकत्र आलो, की खूप मजा करतो.

सहा वर्षांपूर्वी मी भावनिक आणि मानसिकदृष्ट्या खूप वाईट कालखंडातून जात होते, तेव्हा मला कुटुंबाचं महत्त्व समजलं. तेव्हा मला उमगलं, की आपले कुटुंबीयच सर्वांत महत्त्वाचे आहेत. कोणतीही परिस्थिती असो, आपण त्यांच्यावर विसंबून राहू शकतो. इतर कोणाहीपेक्षा आपण आपल्या कुटुंबाला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे.

माझे कुटुंबीय किंवा अन्य कोणाहीबरोबर माझं नातं सुधारण्यासाठी मला त्याच्याबरोबर वेळ व्यतीत करणं महत्त्वाचं आहे, असं वाटतं. कारण तेव्हाच आपल्याला समोरची व्यक्ती अधिक चांगल्या प्रकारे कळू शकते. चित्रीकरणातून पॅक-अप झाल्यावर मी माझ्या मित्रमंडळींनाही जाऊन भेटते. कारण संवाद महत्त्वाचा आहे.

नाती दृढ होण्यासाठी....

  • प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील सदस्यांबरोबर अधिक वेळ व्यतीत केला पाहिजे.

  • कोणत्याही नात्यात निष्ठा महत्त्वाची असते. त्यामुळे पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा निर्माण होतो. कुटुंबातील सदस्यांमध्ये कोणतीही गुपितं असता कामा नयेत.

  • प्रत्येकाने दुसऱ्याची काळजी घेतली पाहिजे आणि दुसऱ्यावर प्रेम केलं पाहिजे. भाऊ किंवा बहिणीबरोबर माझा वाद झाला, तरी आम्ही एकमेकांच्या पाठिशी उभे असतोच. त्यांनाही माझ्याबाबत हाच विश्वास आहे.

  • दुसऱ्याशी संवाद साधणं अतिशय महत्त्वाचं आहे. तसंच कुटुंबासह बाहेर फिरायला जाणं आणि एकमेकांबरोबर वेळ व्यतीत करणं खूप महत्त्वाचं आहे.

  • दुसऱ्याचा आदर आणि मान राखणं; तसंच त्याच्या मताचा आदर करणं हेही खूप महत्त्वाचं आहे.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com