उन्हाळ्यात वणवा लागण्याच्या प्रमाणात वाढ होते. वणवा लागू नये यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन अग्निशमन आणि वन विभागाने शेतकऱ्यांना केले आहे.
अनेकदा पावसाळ्यात गवत चांगले यावे, म्हणून काही शेतकरी आगी लावतात. अनेकदा काही जण रस्त्याने जाता-जाता विडी, सिगारेट पेटवून पेटती काडी टाकतात. त्यामुळे या आगी लागतात. काहीवेळा वनालगतच्या शेतातील पालापाचोळा जाळण्यासाठी आगी लावतात. ही आग आटोक्यात न आल्याने वणवे लागतात.
शेतातील झाडांवर असणारे मधमाशांचे पोळे काढण्यासाठीही आग लावली जाते. वनजमिनीलगतच्या शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. वणव्यात अनेक वनौषधी, सरपटणारे प्राणी, कीटक, तृणभक्षी प्राणी, त्यांची अंडी, घरटी खाक होतात. अंडी व घरटी जळाल्याने अनेक पक्ष्यांचा त्यात बळी जातो. याबाबत जनजागृती चळवळ उभारण्याची गरज आहे.
प्रतिबंधक उपाय कोणते
शासकीय व खासगी जंगलात सहा व बारा मीटरच्या जाळरेषा काढणे.
जंगलात आग निरीक्षणासाठी मनोरा उभारणे.
रस्त्याच्या दुतर्फा सहा मीटरची जाळरेषा काढणे.
जाळरेषेवर पडलेला पालापाचोळा वारंवार झाडणे.
हे करू नये
वनात स्वयंपाक करू नये, तसे करण्यापासून दुसऱ्यास परावृत्त करावे. वनक्षेत्रातील रस्त्यात बिडी, सिगारेट ओढून त्याची थोटके फेकू नयेत.
वनालगतच्या शेतातील पालापाचोळा; तसेच उसाच्या फडाचे पाचट जाळू नये.
रात्री वनातून जाताना हातात टेंभा, पलिते, कंदिल घेऊन जाऊ नये. त्याऐवजी टॉर्च वापरा.
असा होतो परिणाम
जमिनीचा सुपीक मातीचा थर पाण्याच्या प्रवाहात वाहून जातो.
जमिनीची धूप होऊन पाणी धारण करण्याची क्षमता नष्ट होते.
भूगर्भातील पाण्याची पातळी खालावते. विहिरी, तळी वेळेपूर्वीच आटू लागतात.
विविध फळझाडे, बहुगुणी वनौषधी तसेच पक्ष्यांची घरटी, अंडी, पिले नष्ट होतात.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.