पुणे : ‘‘अजित पवार केवळ ईर्षा व स्वार्थापोटी पंचक्वान्नाच्या ताटावरून उठून पत्रावळीवर जाऊन बसले. आता मला कोणी वाढतंय का, अशी वाट त्यांना पहावी लागत आहे,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. ‘महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा अजितदादांचे हे उदाहरण कायम दिले जाईल,’ असेही त्यांनी नमूद केले.
पुणे दौऱ्यावर आलेल्या आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘सुप्रिया सुळे या अजित पवार यांना कायम दादा, दादा करायच्या तेव्हा, मला राग यायचा. कारण दादांना सुप्रिया सुळे यांचे प्रेम; घर तुटू नये, पक्ष तुटू नये ही त्यांच्या मनातील भावना कधीच समजली नाही. प्रेम व हृदय यांचा दादांशी कधी संबंधच आला नाही.’’
अर्चना पाटील यांनी, ‘माझे पती भाजपमध्ये आहेत. राष्ट्रवादी पक्ष का वाढवू’ असे वक्तव्य केले आहे. याबाबत आव्हाड म्हणाले, ‘‘अर्चना पाटील सत्य बोलल्या आहेत. आम्ही देखील तेच सांगत आहोत. रायगड व बारामती या दोन जागा सोडल्या तर अजित पवार यांनी पक्ष फोडून मिळवले तरी काय ? राजकारणात ३५ वर्षे मेहनत घेणारे आज पक्षामध्ये धडपडत आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी अजित पवार यांनी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचे वाटोळे करण्याचे काम केले.’’
वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी मिळालेल्या वसंत मोरे यांचे आंबेडकरी चळवळ, संविधानासाठी काय योगदान आहे, असा सवालही त्यांनी केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी-विद्यार्थिनीला बाहेरच्या गुंडांकडून मारहाण होते. त्यास १०-१२ तास उलटूनही गुन्हा दाखल होत नाही. कुणाला अटक होत नाही. याची पोलिस आयुक्तांना लाज कशी वाटत नाही. मुंबईपेक्षाही पुण्यात गुंडगिरी वाढली आहे.
— जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.